समाजातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी पाच वर्षांपूर्वी वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली. या आघाडीने २०१९ मध्ये लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार उभे करताना उमेदवारांच्या नावापुढे त्यांचा धर्म आणि जात देण्याचा प्रयोग राबविला. मात्र, तो पूर्णपणे अपयशी ठरला. मतदारांनी अशा पद्धतीने मते मागण्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. पुण्यात तर पाच वर्षांनंतरही या पक्षाला पाय रोवता आलेला नाही. पक्षांतर्गत बांधणीची कमतरता, मतदारांशी संपर्काचा अभाव आणि ऐन निवडणुकीत आयात उमेदवार उभे करण्याच्या या पक्षाच्या धोरणामुळे पुणेकरांनी या पक्षाला विजयापासून ‘वंचित’ ठेवले आहे. पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मानणारा आंबेडकरी विचारांचा मतदार आणि मुस्लिम मतदारांच्या जोरावर आघाडीही तग धरून असल्याचे पुण्यात चित्र आहे.

या आघाडीची चार मार्च २०१९ रोजी ‘राजकीय पक्ष’ म्हणून नोंदणी झाल्यावर लोकसभा निवडणूक लढविली गेली. त्यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) इम्तियाज जलील हे निवडून आले. अन्य ४७ जागांवर पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी पक्षाने २८८ पैकी २३४ जागांवर उमेदवार उभे केले. मात्र, सर्व उमेदवार पराभूत झाले. मात्र, अनेक ठिकाणी प्रस्थापितांना पराभूत करण्यास वंचितचा हातभार मोठा राहिला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : आशिया खंडातील श्रीमंत महापालिकेतील ४३७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभय?

पुण्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने अनिल जाधव या नवोदित उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यांचे कार्यक्षेत्र हे पिंपरी -चिंचवड असताना त्यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली. तरीही त्यांनी तब्बल ६७ हजार मते घेतली. ही मते प्रामुख्याने आंबेडकर यांचे समर्थक आणि मुस्लिम मते होती.

मात्र, अन्य मतदारांनी वंचित बहुजन आघाडीकडे पाठ फिरविली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत आयात उमेदवार उभे करण्यावर वंचितने भर दिला होता. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचा निभाव लागला नाही. जेमतेम दहा हजार मते त्यांना घेता आली. शिवाजीनगर मतदारसंघातून अनिल कुऱ्हाडे हे उमेदवार होते. त्यांनाही दहा हजार मतांपुढे जाता आले नाही. कोथरूडमधून दीपक शामदिरे हे उमेदवार होते. त्यांना नीचांकी २४०० मते मिळाली. पर्वतीतून ऋषिकेश नांगरे पाटील हे सात हजार मतांपर्यंतच पोहोचले. पुणे कॅन्टोन्मेंटमधून माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे हे दहा हजार मतांपर्यंत मजल मारू शकले. हडपसरमधील उमेदवार घनश्याम हाक्के यांना साडेसात हजार मते, खडकवासलातून अप्पा अखाडे यांना पाच हजार ९०० मते मिळाली. यावरून पुण्यात मागील विधानसभा निवडणुकीत या पक्षाला छाप पाडता आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>> राज्यातील सर्वात मोठ्या ‘या’ विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मिळेना

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर पुण्यात वंचितचा पक्षाबांधणीमध्ये अभाव दिसतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक लढविणारे उमेदवारही सध्या या पक्षात सक्रिय दिसत नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांना अवघी ३२ हजार मते मिळाली. निवडणूक झाल्यावर त्यांनी हा पक्ष सोडला आणि ते शिवसेना (ठाकरे) पक्षात सामील झाले.

निवडणुका जवळ आल्यावर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागतात. वंचित बहुजन आघाडी मात्र सध्या सुस्तावस्थेत आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया, सभा, मेळावे असल्या कोणत्याही हालचाली या पक्षात दिसत नाहीत. आता विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने हा पक्ष कामाला लागण्याची शक्यता आहे. मात्र, आजवरच्या या पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे पुणेकरांच्या मतांपासून हा पक्ष अद्याप ‘वंचित’ राहिला असल्याचे चित्र आहे.

sujit.tambade@expressindia.com