निवडणुकांचे पडघम वाजू लागले, की प्रत्येक पक्षातील इच्छुक सक्रिय होतात. यंदाच्या निवडणुकीत पक्षांची इतकी भाऊगर्दी आहे, की पुण्याच्या बोळाबोळात ‘इच्छुक’ तयार झाले आहेत. अशा वेळी थोडे इतिहासात डोकावले, की वर्तमानातील वास्तवाचे भान येण्यास मदत होते. त्याचाच हा प्रयत्न…

पुण्यातील राजकीय पक्षांचा धांडोळा घेताना अग्रस्थानी येतो तो काँग्रेस पक्ष. पुण्यातील काँग्रेसची स्थिती कशी आहे? जाज्वल्य पूर्वेइतिहासाच्या अभिमानात जगणारी आणि वास्तवाकडे सोयीस्कर काणाडोळा करून आपल्याच विश्वात रममाण झालेली संघटना म्हणजे काँग्रेस. एके काळी पुण्यावर अधिराज्य गाजवलेली काँग्रेस आज महापालिकेत दोनआकडी नगरसेवकदेखील निवडून आणू शकलेली नाही. तरीही जागी न झालेली काँग्रेस अंतर्गत गटबाजीने पोखरली असून, गेल्या अडीच वर्षांत पक्षाला पूर्णवेळ शहराध्यक्षाचीही नेमणूक करता आलेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत गटतट विसरून समेट कसा घडवायचा आणि उमेदवार निवडून कसे आणायचे, हेच काँग्रेसपुढील मोठे आव्हान असणार आहे.

एके काळी काँग्रेसचा पुण्यावर एकहाती अंमल होता. २००७ पर्यंत माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या काँग्रेसचे पुणे महापालिकेवर प्राबल्य होते. २०१२ च्या महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेसला उतरती कळा लागली. २००७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस ६१ नगरसेवकांवरून ३५ नगरसेवकांवर आली. २०१२ च्या निवडणुकीत २७ नगरसेवकांपर्यंतच काँग्रेसला मजल मारता आली. २०१७ ची निवडणूक ही काँग्रेसच्या दृष्टीने मानहानीकारक ठरली. त्या निवडणुकीत काँग्रेसला नगरसेवकांची दोन आकडी संख्याही पार करता आली नाही. अवघे नऊ नगरसेवक निवडून आले. तेव्हापासून दबलेली काँग्रेसला डोके वर काढायला संधी मिळालेली नाही.

आणखी वाचा-Raj Thackeray in Pune : “महाराष्ट्रात असे लोक आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत”, राज ठाकरेंचा टोला

महापालिका निवडणुकांच्या निकालांचे पडसाद विधानसभा निवडणुकांवर पडलेले दिसतात. सध्या कसबा वगळता पुणे शहरात कोठेही काँग्रेसचा आमदार नाही. अर्थात, कसब्यातील निकालात काँग्रेस पक्षापेक्षा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वैयक्तिक करिष्म्याचा वाटा जास्त आहे. आजवर झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यास पुणेकरांनी काँग्रेसला भरभरून साथ दिलेली दिसते. मात्र, अंतर्गत गटबाजी उफाळून आली की, काँग्रेसला दगाफटका झालेला दिसतो. कसबा हा विधानसभा मतदारसंघ हा भाजपबहुल मतदारांचा असला, तरीही काँग्रेसने एक होऊन या ठिकाणी लढा दिल्यावर काँग्रेसला यश मिळालेले दिसते. या मतदारसंघातून १९७६ मध्ये आर. व्ही. तेलंग, १९७२ मध्ये लीला मर्चंट, १९८५ मध्ये उल्हास काळोखे, १९९१ मध्ये वसंत थोरात आणि विद्यामान आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट विधनसभा मतदार संघातूनही कृष्णराव गिरमे, चंद्रकांत शिवरकर आणि रमेश बागवे हे काँग्रेसचे आमदार विजयी झाले आहेत. पर्वती विधानसभा मतदार संघात वसंत थोरात, शरद रणपिसे, रमेश बागवे हे काँग्रेसचे आमदार झाले आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सदाशिव बर्वे, रवींद्र मोरे, विनायक निम्हण हे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, कोथरूड आणि वडगाव शेरीमध्ये काँग्रेसला कधीही यश मिळालेले नाही.

आणखी वाचा-‘कसब्या’साठी खासदारांचा जनसंपर्क

पुण्याच्या काँग्रेसला देदीप्यमान इतिहास आहे. १९३८ मध्ये काँग्रेसने तत्कालीन पुणे नगरपालिकेच्या निवडणुका लढविल्या. तोपर्यंत १८८३ ते १९२० पर्यंत जहाल, मवाळ आणि स्वतंत्र असे तीनच पक्ष किंवा गट अस्तित्वात होते. १८९५ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकमान्य टिळक प्रथम निवडून आले आणि तेथून जहाल पक्षाचा प्रवेश नगरपालिकेत झाला. १९१४ ते १९२० पर्यंत लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनाखाली काही सभासद नगरपालिकेच्या सभागृहात जहाल पक्षाचे विचार मांडत होते. १८९५ पासून असलेल्या मवाळ पक्षाचे संख्याबळ जहाल पक्षाच्या तुलनेत जास्त होते. १९२० नंतर नवीन पक्ष येऊ लागले. जहाल, मवाळ हे पक्ष जाऊन काँग्रेस, हिंदू सभा, मुस्लिम लीग, सत्यशोधक असे पक्ष आले.

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची चळवळ वाढीस लागल्यानंतर काँग्रेसला पुण्यात महत्त्व प्राप्त होत गेले. १९३८ मध्ये काँग्रेसने पुणे नगरपालिकेत ५३ टक्के मिळविली होती. त्या काळात डॉ. ना. भि. खरे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याचे प्रकरण गाजले आणि त्यानंतर काँग्रेसला फटका बसत गेला. १९४२ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले. १९४५ च्या निवडणुकांमध्येही काँग्रेसला बहुमत मिळविता आले नाही. १९५२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा नागरी संघटनेला बहुमत मिळाले, तर १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेस अल्पमतात गेली. नंतरच्या काळात पुण्यातील काँग्रेसला विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, सुरेश कलमाडी यांच्या माध्यमातून प्रभावी नेतृत्त्व लाभले. मात्र, त्यानंतर अंतर्गत लाथाळ्या आणि गटबाजीत दुभंगलेल्या अवस्थेत सध्याची काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, अशी सद्या:स्थिती आहे.