पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६,०९१ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना ३७ व्या फेरीअखेर एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. दुसरीकडे महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली. त्यामुळे कलाटेंच्या बंडखोरीचा भाजपाला फायदा झाल्याची चर्चा आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता अश्विनी जगताप यांनी एका वाक्यात उत्तर दिलं.

राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फायदा झाला का? असा प्रश्न विचारला असता अश्विनी जगताप म्हणाल्या, “नक्कीच, राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा मला फायदा झाला.”

“गड आला, पण सिंह गेला”

पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवर बोलताना अश्विनी जगताप म्हणाल्या, “ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गड आला, पण सिंह गेला. लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं, त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा गड राखायचा होता. तो गड सर्वांनी राखला आहे.”

हेही वाचा : शिवसेनेची मालमत्ता व संपत्ती ते ब्राह्मण समाजाची नाराजी, एकनाथ शिंदेंसह महत्त्वाच्या नेत्यांची गाजलेली वक्तव्यं

“मी हा विजय लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते”

“माझा सुरुवातीपासून सर्वांवर विश्वास होता. मी हा विजय लक्ष्मण जगताप आणि सर्व सामान्य नागरिकांना समर्पित करते. माझे वरिष्ठ नेते जेव्हा सांगतील तेव्हा मी अधिवेशनालाही येणार आहे. मी सर्वसामान्यांचा आमदार म्हणून काम करेन. सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले असतील,” असं मत अश्विनी जगताप यांनी व्यक्त केलं.

Story img Loader