पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात येत्या रविवारी (१४ जुलै) होणारी भारतीय जनता पक्षाची चिंतन बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ती २१ जुलै रोजी होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बालेवाडी येथील या बैठकीत राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व खासदार, आमदार, शहर आणि जिल्हाप्रमुख उपस्थित राहणार आहेत. विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालांमुळे भाजपच्या विरोधकांची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीपुढे महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असणार आहे. राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, भाजपविरोधी पक्षांची झालेली एकजूट, लोकसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने या बैठकीत व्यूहरचना आखली जाणार आहे. ही बैठक येत्या रविवारी (१४ जुलै) होणार होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातु:श्रीचे निधन झाल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा – किनारपट्टी, पश्चिम घाट परिसरात उद्यापासून तीन दिवस पावसाचा जोर

हेही वाचा – कडधान्य, तेलबियांची विक्रमी पेरणी, सोयाबीन, मका, कापूस, तुरीचा पेरा वाढला

दरम्यान, बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून बालेवाडी येथील मैदानाची पाहणी करण्यात आली. केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री बैठकीच्या आधी एक दिवस पुण्यात येणार आहेत. त्यांच्या निवासाची सोय विविध पंचतारांकित हाॅटेलमध्ये करण्यात येणार आहे. शहा हे शनिवारी (२० जुलै) पुणे मुक्कामी असणार आहेत. या बैठकीला किमान तीन हजार पदाधिकारी उपस्थित असतील, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.