पुणे : प्रवासी वाहतूक करणारी भरधाव बस कंटेनरवर आदळल्याने दहा प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. अपघातात बसचालक जखमी झाला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी सदानंद महादेव खोत (वय ३०, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्वतेज अभिमन्यू जाधव (वय २३, रा. हडपसर) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस बाह्यवळण मार्गावरुन कोल्हापूरकडे निघाली होती. जांभुळवाडी परिसरात बसचालक खोत याचे नियंत्रण सुटले आणि बस कंटेनरवर आदळली. अपघातात बसचालक खोत याच्यासह दहा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी चालकासह प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलीस हवालदार पी. एन. कांबळे तपास करत आहेत.

बोपदेव घाटात रिक्षाच्या दुचाकीस्वार दाम्पत्य जखमी

बोपदेव घाटात रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील भीमसिग कुंवर (वय २७) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार कुंवर आणि त्यांची पत्नी बाेपदेव घाटातून निघाले होते. डी. जे. पेट्रोल पंपाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव रिक्षाने दुचाकीस्वार कुंवर दाम्पत्याला धडक दिली. अपघातानंतर रिक्षा घटनास्थळी सोडून रिक्षाचालक पसार झाला. कोंढवा पोलिसांकडून रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत आहे.