दत्ता जाधव
पुणे : ढगाळ हवामान, तापमानात अचानक झालेली वाढ आणि २४, २५ मे रोजी पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून यंदा आंबा प्रक्रियेसाठी (कॅनिंग) जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅनिंगला जाणारे आंबे २८ ते ३० रुपये दराने विकले जात असल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही अशी उत्पादकांची तक्रार आहे. कॅनिंगसाठीच्या आंब्यांना किमान ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी मागणी आंबा उत्पादक करीत आहेत. एक मेपासून कोकणात आंबा कॅनिंगला जाऊ लागला आहे. एकूण आंब्यांपैकी ६० टक्के आंबा १ मे ते २० मे दरम्यान काढणीस आला आहे. कमी काळात जास्त आंबा काढणीला आल्यामुळे मजूर टंचाई जाणवत आहे. आंबा काढणी आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी मजूर मिळेना झाले आहेत. आंबा वेळेत काढणी न करणे, तो योग्य प्रकारे पिकविण्यासाठी न ठेवणे, ढगाळ हवामान, अचानक तापमान वाढल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्यामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. असा आंबा निर्यात करता येत नाही, बाजारातही डाग लागलेल्या आंब्याला मागणी असत नाही. हा आंबा फेकून देण्यापेक्षा शेतकरी कॅनिंगला देतात. अखेरच्या टप्प्यातील सुमारे ४० टक्के आंबा कॅनिंगला जाणार आहे. मात्र, कॅनिंगचे दर २८ रुपयांपासून ३२ रुपयांपर्यंत आहेत. हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे. किमान ४० रुपये प्रतिकिलो दर दिल्यास शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्च निघून दिलासा मिळेल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा