पुणे : शहरातील नैसर्गिक ओढे, नाल्यांवर झालेली अतिक्रमणे, प्रवाह बदलल्यानेच शहरात परतीच्या पावसाने पूरस्थिती ओढवल्याचे समोर आले आहे. तसेच गटार वाहिन्यांत मोठय़ा प्रमाणात माती, गाळ साचला असल्याने त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच कमी झाल्याने  बिकट परिस्थिती निर्माण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील नदीपात्रामध्ये भराव टाकून नदीचे पात्र आकुंचित करण्याचे उद्योग सुरू असतानाच, आता पूररेषाही नदीच्या बाजूला नेल्या जात आहेत. अशा विविध कारणांमुळे शहरात दरवर्षी पावसाळय़ात पूरस्थिती ओढवत आहे. सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. पावसाळी गटार वाहिन्यांमधून पाण्याचा निचरा पुरेशा प्रमाणात न झाल्याने रस्त्यांवर पाणी आले होते. विकासाच्या नावाखाली शहरातील नैसर्गिक ओढे, नाल्यांचे  प्रवाह बदलण्यात आले. धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नदीकाठच्या नागरिकांना धोका संभवतो.

याबाबत बोलताना जलदेवता सेवा अभियानचे संस्थापक शैलेंद्र पटेल म्हणाले, की जलसंपदा विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महापालिका यांच्याकडील नकाशांमध्ये ओढे, नाले दिसतात. मात्र, ते केवळ नकाशावरच असून प्रत्यक्षात त्यावर अतिक्रमणे झाली आहेत.

 पुण्यातील पावसाचे प्रमाण ३३ ते ३५ टक्के पाऊस वाढणार असल्याचे भाकित आहे. हे गृहित धरूनच सांडपाणी व्यवस्थापन करायला हवे.  पाणी साचण्याला प्रशासनासह पुण्याचे नागरिकही जबाबदार आहेत.  पावसाळी गटार वाहिन्यांत काही कमतरता असेल, तर नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवणे आवश्यक आहे. अस्तित्वातील पावसाळी गटार वाहिन्यांत माती, गाळाबरोबरच प्लास्टिकही जमा झाले आहे. प्लास्टिकमुळेही सांडपाणी वाहिन्यांचे प्रवाह आक्रसले आहेत. या पार्श्वभूमीवर या समस्यांच्या निराकरणासाठी आणि समस्या येऊच नये म्हणून नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी दरमहा जनसुनावणी व्हायला हवी’, अशी अपेक्षा सागरमित्र अभियानाचे सहसंचालक विनोद बोधनकर यांनी व्यक्त केली.

पुण्याच्या बिकट अवस्थेची जबाबदारी भाजपने स्वीकारली

पुणे : संपूर्ण शहर पावसामुळे सोमवारी पाण्यात गेल्यानंतर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशा शब्दात जबाबदारी टाळणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अखेर उपरती झाली. पुण्यात   मुसळधार पाऊस कोसळला. ही आपत्ती असली तरी नागरिकांना झालेल्या त्रासाची जबाबदारी पालकमंत्री म्हणून स्वीकारत आहे. महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे ही जबाबदारी भाजपची आहे, अशी  कबुली  चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त करतानाच अजित पवार यांनीही त्यावरून राजकारण करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

दिवाळीत विश्रांती

पुणे : राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या आठवडय़ापासून मुसळधार पाऊस होत असला, तरी दिवाळीच्या कालावधीत राज्याच्या विविध भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातून मोसमी वारे वेगाने परतीचा प्रवास करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक भागांतच पुढील एक-दोन दिवस हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. परतीच्या पावसाने राज्याच्या विविध भागांत धुमाकूळ घातला आहे. शहरांमध्ये दाणादाण उडवून देण्यासह शेतीतेही मोठे नुकसान या पावसाने केले आहे.

तज्ज्ञ म्हणतात..

पुण्यात शहरीकरण मोठय़ा प्रमाणात झाले आहे. विविध कारणांमुळे चटई क्षेत्र निर्देशांक  वाढवला जात आहे. याशिवाय जेव्हा मोठे प्रकल्प येतात, तेव्हा सांडपाणी वाहिन्यांच्या उताराबाबत साधकबाधक विचार केला जात नाही.

अडचण आणि उपाय..   विकास आराखडय़ात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा  विसर्ग  नदी,  नाल्यांमध्ये जाऊ शकत नाही. त्यावर उपाय म्हणून  जुने नकाशे विकास आराखडय़ात  आरेखित करून संरक्षित केले पाहिजेत.