उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मागणी
पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची नियुक्ती झाली याचा आनंदच आहे. मात्र पुणे विद्यापीठात असताना डॉ. पंडित यांच्यावर झालेले आरोप, त्यांच्यावरील कारवाई चुकीची होती का, त्याबाबत केंद्र सरकारच्या व्हिजिलन्स समितीने काय केले, याबाबत माहिती नाही. पंडित यांच्या नियुक्तीची चौकशी करणार कोण, असा प्रश्न उपस्थित करत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पंडित यांची नियुक्ती कशी झाली याचे उत्तर केंद्राने देशाला दिले पाहिजे, अशी मागणी केली.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. शांतिश्री धुलपुडी पंडित यांची नियुक्ती झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. २००२ ते २००७ या कालावधीत भारतीय वंशाचे नागरिक (पीआयओ) या राखीव जागांवरील प्रवेश गैरप्रकाराबाबत डॉ. पंडित यांच्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेली पाच वेतनवाढी रोखण्याची कारवाई, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्याकडे केलेले दुर्लक्ष असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आलेल्या सामंत यांना डॉ. पंडित यांच्या नियुक्तीबाबत, डॉ. पंडित यांनी घेतलेल्या बाराशे दिवसांच्या रजेबाबत प्रश्न विचारण्यात आले.
डॉ. पंडित यांना बाराशे दिवसांची रजा कशी देण्यात आली. याबाबत चौकशी करण्यात येईल. केंद्राच्या व्हिजिलन्स समितीने विद्यापीठाच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले असल्यास विद्यापीठाने डॉ. पंडित यांच्यावर केलेली कारवाई चुकीची होती का, ती कारवाई चुकीची असल्यास त्या प्रकरणाची चौकशी आणि केलेल्या कारवाईचे काय करायचे, असे प्रश्न निर्माण होतात. डॉ. पंडित यांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्राला पत्र लिहिणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.