‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिॲलिटी शोच्या पहिल्या पर्वातून तेजपाल वाघ याने मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा काही मालिकांचं लेखनही तेजपालने केलं; पण ‘लागीरं झालं जी’ ही मालिका त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरली. तेजपाल मूळचा सातारा जिल्ह्यातल्या खटावचा! वाईत त्याचं बालपण गेलं. तेजपालच्या जडणघडणीत सार्वजनिक गणेशोत्सवाचं योगदान मोठं आहे. गणेशोत्सवाबाबत त्याच्याशी मारलेल्या या गप्पा!

गणपतीचं आणि तुझं नातं काय?

● गणपती ही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता असं आपण म्हणतो. गणपतीबद्दल प्रेम आणि जिव्हाळा नाही अशा व्यक्ती शोधून सापडणार नाहीत. माझंही काही वेगळं नव्हतं. गणपती आणि गणेशोत्सवाची ओढ मला वर्षभर वाटायची. सातारा जिल्ह्यातलं खटाव हे माझं गाव. पण माझी जडणघडण मात्र वाई या गावी झाली. वाई हे निसर्गसौंदर्याने नटलेलं गाव. गणपती हे वाईचं आराध्य दैवत! आमच्या घरी गणपती नव्हता, पण वाईमध्ये शाहीर चौक परिसरात माझं बालपण गेलं. तिथलं आता ७५ वर्षांची परंपरा असलेलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि तिथला गणेशोत्सव हे माझ्यासाठी घरच्या गणपतीहून वेगळं नव्हतं. ज्यांच्या घरी गणपती असतो त्यांना घरगुती उत्सव आपलासा वाटतो. माझ्यासाठी मात्र मंडळाचा उत्सव हे जास्त जिव्हाळ्याचं प्रकरण होतं आणि आजही ते तसंच आहे. त्यामुळेच गणेशोत्सवाचे दिवस जवळ आले, की आजही मला वाई आणि तिथल्या उत्सवाचे वेध लागतात.

हेही वाचा >>> Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना

गणेशोत्सवाच्या तुझ्या काही आठवणी आहेत?

● गणेशोत्सव हा माझ्यासाठी आठवणींचा खजिना आहे. किती आठवणी सांगू? मोठ्या लोकांच्या मंडळात आम्हा लहान मुलांना घेत नसत म्हणून मी माझ्या मित्र आणि भावंडांबरोबर आमचं लहान मुलांचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुरू केलं होतं. सगळे जण घरातल्या बेडशीट आणून त्याचे पडदे लावून सजावट करायचो. आमच्या या मंडळासाठी आम्ही वर्गणीही गोळा करायचो. एकदा कुणी तरी ‘पावती पुस्तक कुठे आहे,’ असं विचारलं. पावती पुस्तक छापायला पैसे कुठे होते? पण त्याबाबत तक्रार करायचा स्वभाव नव्हता. वह्यांच्या पानांच्या पावत्या करून त्यावर सुवाच्य अक्षरात मंडळाचं नाव, वर्गणीची रक्कम लिहून, कार्बन घालून आम्ही पावत्या करायचो आणि वर्गणी देणाऱ्यांना द्यायचो. सांस्कृतिक कार्यक्रम, आरत्या, मिरवणूक… सगळं काही वाजतगाजत आणि साग्रसंगीत असायचं! आजही मला गणेशोत्सवात वाईतले ढोल, सनई-चौघड्याच्या सुरावटींवर होणारी विसर्जन मिरवणूक हे सगळं आठवतं. शहरातल्या मिरवणुका भव्यदिव्य आणि देखण्या असतीलही; पण मला मात्र तो साधेपणाच जास्त भुरळ घालतो.

गणेशोत्सवातली तुझी एखादी खास आठवण?

● गणेशोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे समीकरण खास असतं. माझ्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला, कौशल्यांना गणेशोत्सवानेच वाव दिला. तेव्हा टीव्हीवर झी हॉरर शो लागायचा. आम्ही हलत्या देखाव्यांमध्ये हॉरर शो करायचो. देखावे पाहायला येणाऱ्यांना घाबरवणं ही गंमत वाटायची. जिवंत देखाव्यांचं स्क्रिप्ट लिहिण्यापासूनच माझ्यातल्या लेखकाला लेखणी गवसली असं म्हणायला हरकत नाही. खरं तर माझा मामा सिद्धहस्त लेखक. वाईतील जवळजवळ सगळ्या जिवंत देखाव्यांसाठी तो लेखन करायचा. मामाच्या प्रेरणेतून मी लिहू लागलो आणि पुढे लिहीतच राहिलो. अशा अनेक गोष्टी आहेत. मला आठवतंय त्याप्रमाणे १९९३ ला किल्लारीचा भूकंप झाला तो दिवस गणपती विसर्जनाचा होता. मिरवणूक सुरू असताना भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि आम्ही मुलं विसर्जनाच्या ट्रकवर गणपतीजवळ बसलेलो असताना गणपतीची मूर्ती आमच्या बाजूला सरकली होती. भूकंप झालाय हे मोठ्या माणसांच्या लक्षात आलं होतं की नाही माहिती नाही. पण काही वेळ मिरवणूक थांबली आणि नंतर ती लवकर संपवली अशी आठवण आहे.

गणेशोत्सवाचं स्वरूप अलीकडे खूप बदलतं आहे, त्याकडे तू कसं पाहतोस?

● सण समारंभ आणि उत्सवांच्या निमित्ताने खरेदी होते. बाजार गजबजतात. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. हे छानच आहे. त्याला प्रोत्साहनच दिलं पाहिजे. पण उत्सवांचं बाजारीकरण होत असेल तर मला वाईट वाटतं. ते थांबावं असं मला मनापासून वाटतं. उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येताना सलोखा, एकोपा जपला जाणं मला खूप गरजेचं वाटतं. ते होत नसेल तर आपलं काही तरी चुकतंय असं फार वाटतं आणि हुरहुर लागते.

येत्या काळात तुझ्या कोणत्या कलाकृती येणार आहेत?

● गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नुकतंच एका नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केलंय. मालिकालेखन आणि निर्मिती मी बऱ्याच वर्षांपासून करत आलो आहे. पण आता दिग्दर्शनात पदार्पण करतोय. उषा काकडे यांची पहिली निर्मिती असलेला ‘विकी फुल्ल ऑफ लव्ह’ हा सिनेमा आहे. नुकताच करण जोहरच्या हस्ते आम्ही त्याचा मुहूर्त केला. सन मराठीवर सुरू असलेल्या कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे संवाद लिहितोय. त्यामुळे हे वर्ष भरगच्च असणार असं दिसतंय!