मेट्रोच्या भूमिपूजन कार्यक्रमात आपल्याला फारशी संधी मिळणार नाही, हे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसने काही गोष्टींचे राजकारण धूर्तपणे केले. प्रसंगी त्यासाठी त्या पक्षाने काँग्रेसचाही वापर करून घेतला. काँग्रेसला मात्र राष्ट्रवादीचे राजकारण कळलेच नाही. शिवाय, मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी निषेध सभा ठरलेली असताना भूमिपूजन करून काँग्रेसने काय साधले, अशी चर्चा खुद्द काँग्रेसमध्येच सुरू झाली. त्यामुळेच काँग्रेसचे अनेक नगरसेवक आणि विद्यमान पदाधिकारी देखील या कार्यक्रमांपासून दूर राहिले.
प्रत्येक टप्प्यावर वाद झालेल्या आणि त्यामुळे वेळोवेळी विलंबही होत गेलेल्या मेट्रोचे भूमिपूजन गेल्या पंधरवडय़ात वादात सापडले होते. पुणे मेट्रो प्रकल्पावर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरीची मोहोर उमटवली आणि त्या पाठोपाठ मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते आम्ही करणार, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाने करून टाकली. ही घोषणा होताच भूमिपूजनाचा वाद सुरू झाला. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मेट्रोचे श्रेय सर्वानाच हवे आहे. त्यामुळे भाजपने कार्यक्रम जाहीर करताच राष्ट्रवादीने त्याला विरोध केला आणि मेट्रोचे भूमिपूजन दोनदा होणार, अशी शक्यता दिसू लागली. या वादातून मार्ग निघाला आणि महापौरांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करावे असे पत्रही केंद्राला पाठवले.
प्रत्यक्षात, पालकमंत्री गिरीश बापट यांनी कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा वाद सुरू करण्यात आला. या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महापौर प्रशांत जगताप थांबले नाहीत, तर त्यांनी आदल्या दिवशी मेट्रोचे भूमिपूजन केले जाईल असे घोषित करून निमंत्रण पत्रिकाही छपाईसाठी पाठवली. पुढे या वादात मुख्यमंत्र्यांची शिष्टाई कामी आली तो वादही मिटला.
राष्ट्रवादीने या वादात काँग्रेसचीही साथ घेतली. मेट्रोचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करावे असा ठराव पक्षनेत्यांच्या बैठकीत मंजूर करताना त्या ठरावाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. नंतरही जेव्हा पंतप्रधानांचा कार्यक्रम जाहीर झाला, तेव्हा काँग्रेसने स्वत:हूनच महापौरांना पत्र दिले आणि भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते करावे, अशी मागणी केली. प्रत्यक्षात, राष्ट्रवादीने त्या पक्षाला ज्या गोष्टी सोयीस्कर होत्या त्या करून घेतल्या आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सगळा विरोध मावळला. या सगळ्या राजकारणात काँग्रेसची मात्र चांगलीच फरपट झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमातही असेच घडले होते. राष्ट्रवादीने अशाच प्रकारे वेगवेगळ्या मुद्यांवर विरोध केला आणि नंतर त्यांचा विरोध मावळला होता. मेट्रो भूमिपूजनातही हेच होणार होते, हे सर्वाना माहिती होते; पण हे राजकारण काँग्रेसच्या नेतृत्वाला कळले नाही.
मुळातच काँग्रेसने पवार यांनी उद्घाटन करावे असे पत्र देणे हाच धक्कादायक मुद्दा होता. त्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मेट्रो प्रकल्प मार्गी लागल्यामुळे त्यांनाही मुख्य कार्यक्रमात सन्मानाने सहभागी करून घ्यावे, अशी मागणी काँग्रेसने अत्यंत ठामपणे व आग्रहाने करायला हवी होती. तसे करण्याऐवजी काँग्रेसने पवार यांच्या नावाचा आग्रह का धरला हे त्या पक्षातही कोणाला समजले नाही. तेवढय़ावर काँग्रेस थांबली नाही. राष्ट्रवादीने मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे जाहीर करून भाजपशी जमवून घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने आदल्या दिवशी भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर करून टाकला. शिवाय, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा घाट घालण्यात आला. पंतप्रधान ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत अशा प्रकल्पाचे भूमिपूजन आदल्या दिवशी आणि तेही वेगळ्याच ठिकाणी करण्याच्या या निर्णयाबाबत काँग्रेसमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती.
भूमिपूजन न करता केवळ निषेध सभा घ्यावी, असाही विचार पुढे आला होता. तरीही काँग्रेसच्या अतिउत्साही स्थानिक नेत्यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम चव्हाण यांच्या हस्ते घडवून आणला. या कार्यक्रमाने काही परिणाम साधला तर नाहीच, उलट पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत, समंजस, राजशिष्टाचार, संकेत यांची उत्तम जाण असलेल्या आणि पंतप्रधान कार्यालयात मंत्री राहिलेल्या नेत्याने अशा प्रकारचा कार्यक्रम करायला नको होता, फार तर त्यांच्या उपस्थितीत निषेध सभा घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया खुद्द काँग्रेसमध्ये उमटली. मेट्रोच्या मंजुरीसाठी झालेला विलंब, वाढलेला खर्च असे अनेक मुद्दे उपस्थित करत ही सभा घेता आली असती. मात्र हे मुद्दे पुढे आलेच नाहीत. एवढय़ावर न थांबता पुन्हा कार्यक्रमाच्या दिवशी काँग्रेसने निदर्शनेही केली आणि त्या कार्यक्रमापासूनही पक्षाचे नगरसेवक आणि बहुसंख्य पदाधिकारी दूरच राहिले. एकुणातच मेट्रोच्या या विषयात काँग्रेसच्या चाली चुकल्या. वेगवेगळ्या मार्गाने आटापिटा करण्यात आला; पण तोही व्यर्थ ठरला.