पुणे : समाजकल्याण आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या खडकवासल्यातील शासकीय वसतिगृहातील दूषित पाण्यामुळे १० ते १२ विद्यार्थिनींना पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला असून तशी तक्रार वसतिगृह प्रशासनाकडे विद्यार्थिनींनी केली आहे. दरम्यान, जलशुद्धीकरण यंत्राच्या तपासणीनंतर यंत्रामध्ये कोणताही बिघाड नसल्याचा खुलासा विधिमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आला.
समाजकल्याण आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या खडकवासल्यातील शासकीय वसतिगृहातील दूषित पिण्याच्या पाण्यामुळे काही विद्यार्थिंनी पोटदुखी, मळमळ असा त्रास होऊन अंगावर खाज आणि पुरळ आल्याचा प्रकार जानेवारी महिन्यात उघडकीस आला होता. त्याबाबतची माहिती विधापरिषदेत आमदार योगेश टिळेकर यांनी तारांकित प्रश्नोत्तरावेळी विचारली.
वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणती खबरदारी घेण्यात आली; तसेच या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, अशी विचारणा टिळेकर यांनी केली. त्याला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दूषित पिण्याच्या पाण्याची तक्रार आल्याची माहिती दिली.
‘वसतिगृहाील विद्यार्थिनींना पोटदुखी, मळमळ असा त्रास होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्रास झालेल्या विद्यार्थिनींना नजीकच्या रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. वसतिगृहातील जलशुद्धीकरण यंत्राची तपासणी केली असता, यंत्रामध्ये कोणताही बिघाड आढळून आला नाही. तसेच विद्यार्थिंनीना स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरठा करण्याची कार्यवाही वसतिगृह स्तरावर करण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही,’ अशी माहिती मंत्री शिरसाट यांनी सभागृहात दिली