पुणे : उत्तर महाराष्ट्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीपासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. शुक्रवारीही (२७ सप्टेंबर) या भागात पावसाचा जोर राहणार आहे. शनिवारपासून (२८ सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले जात आहेत. या चक्रीय स्थितीपासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर. उत्तर महाराष्ट्रातील नगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राला नारंगी इशारा दिला आहे. त्यासह दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पिवळा इशारा दिला आहे. या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

हे ही वाचा…राज्यात दोन दिवसांत पिकांची दाणादाण जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यात, किती नुकसान

उत्तर महाराष्ट्रावरील वाऱ्याची चक्रीय स्थितीचा प्रभाव शुक्रवारी सायंकाळपासून कमी होईल. त्यामुळे शनिवारपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. साधारणपणे दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी असेल, या काळात बहुतांश ठिकाणी पाऊस उघडीप देण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोक्याचा दूरध्वनी आणि पोलिसांची धावपळ; ‘अभियंत्याने’…

शुक्रवारसाठी पावसाचा अंदाज

नारंगी इशारा – पालघर, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार
पिवळा इशारा – दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ