पुणे : उत्तर कोकणपासून दक्षिण बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस निर्माण झाला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन छत्तीसगडवर हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे. पालघर, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणापासून दक्षिण बांगलादेशपर्यंत हवेच्या कमी दाबाचा आस निर्माण झाला आहे. मंगळवारी (२५ सप्टेंबर) ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीनजीक तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन छत्तीसगडवर हवेच्या वरच्या थरात वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती कमी दाबाच्या आसावर आहे. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे ही वाचा… पुणे :आरक्षण संपवणे ही काँग्रेसची मानसिकता, भाजपच्या खासदाराचा घणाघात

राजस्थान, कच्छमधून (गुजरात) सुरू झालेला मोसमी पावसाचा परतीचा प्रवास बुधवारी थांबला. बुधवारी मोसमी पावसाने कुठूनही माघार घेतली नाही. छत्तीसगडवर असलेली हवेची चक्रीय स्थिती आणि बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे परतीचा पाऊस काही काळ रेंगाळण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा जोर राहील. शनिवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी दिली.

गुरुवारसाठी पावसाचा अंदाज
लाल इशारा – पालघर, नाशिक
नारंगी इशारा – पुणे, रायगड, मुंबई, ठाणे. धुळे, नंदूरबार
पिवळा इशारा – उर्वरित राज्य

शनिवारपासून जोर कमी होणार

पावसाचा जोर आणखी दोन दिवस राहील. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा दहा जिल्ह्यांत शनिवारपासून (२८ सप्टेंबर) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

हे ही वाचा…पुणे : रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

हा परतीचा पाऊस नाही

राज्यात सध्या सर्वदूर होत असलेला पाऊस परतीचा पाऊस नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभरात पाऊस होत आहे. मोसमी वाऱ्यांनी गुजरात आणि राजस्थानमधून परतीचा प्रवास सोमवारपासून (२३ सप्टेंबर) सुरू केला आहे. बुधवारी (२५ सप्टेंबर) मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास थांबला आहे. राज्यातून मोसमी वारे माघारी जात असताना किंवा मोसमी वाऱ्याचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू असताना पडणाऱ्या पावसाला परतीचा पाऊस म्हणता येईल, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी दिली.