इंदापूर : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई, म्हशी पाळून त्यांचे संगोपन करुन शेतकरी दुग्ध व्यवसाय करून संसाराला हातभार लावतात.दुधाचा दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत असतानाच आता शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसात चारा टंचाई जाणवत असतानाच अलीकडच्या काळात पशुखाद्याच्या किंमती भरमसाठ वाढल्याने मेटाकुटीला आला आहे.
बदलत्या ऋतूत व वातावरणात दूध व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यातच गेल्या दोन वर्षापासून दूधाला दरही व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार सातत्याने दूध उत्पादक करीत आहेत. दूधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.याचा दूध व्यवसायावर परिणाम होत आहे.शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या दुग्ध व्यवसायावर जणू काही संक्रांत आली आहे .त्यामुळे सहकारी व खासगी दूध संघाने खरेदी दर वाढवण्याची मागणी होत आहे.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर चारा टंचाई भेडसावणार असल्याने पशुपालक चिंतेत आहेत. त्यातच उत्पादन आणि खर्च पाहता दुध व्यवसायाचे गणित बिघडत चालले आहे. पशुखाद्याचे दर तर गगणाला भिडले असताना त्यामानाने दुधाला दर मिळत नाही. ही खरी शोकांतिका आहे. दूधाचा उत्पादन खर्च ३५ ते ४० रुपये झाला आहे .आणि दूधाला सरासरी दर मात्र २५ ते ३३ रुपये मिळत असल्याने दूध व्यवसाय हा शेतीपूरक जोड व्यवसाय न रहाता आतबट्ट्याचा खेळ झाला आहे.असे म्हणण्याची वेळ दूध उत्पादकावर आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून दुधाचे दर पडले आहेत. त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांनी दुभत्या जनावराकडे दुर्लक्ष केले. काहींनी दूभती जनावरे मिळेल त्या किंमतीने विकली .प्रशासन ही जाणीवपूर्वक दराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दूध उत्पादकातून वारंवार होत आहे.सध्या दूध उत्पादकांना २५ ते ३२ रुपये एका लिटर मागे दर मिळत असला तरी, शहरी भागात मात्र हेच दूध शहरात दुप्पट दराने विकले जात आहे.हा मोठा विरोधाभास आहे. दूधाचे पडलेले दर व चारा तसेच पशुखाद्याचे वरचेवर वाढत जाणारे भाव यामुळे दूध उत्पादक शेतकरी गाय,म्हैस आदि जनावरे कमी करून शेळीपालन व्यवसायाकडे वळण्याच्या मार्गावर आहे. तर अनेकांनी घरगुती गावरान कोंबड्या पालन सुरू केले असल्याचे चित्र दिसत आहे.