लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) मुदतीत लावण्यासाठी तातडीने केंद्रांची संख्या वाढवावी,’ असे आदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) रोजमेर्टा कंपनीला दिले आहेत.

नोंदणी केलेल्या अनेक वाहनचालकांना पाटी बदलण्यासाठी मे, जूनच्या वेळा देण्यात आल्याने, अशा स्थितीत ३० एप्रिलनंतर कारवाई करायची किंवा नाही, असा पेच आरटीओसमोर आहे. त्यामुळे ‘आरटीओ’ने कंपनीला केंद्रांची संख्या वाढविण्याची सूचना केली आहे. ‘केंद्रांची नियुक्ती करताना कुशल कर्मचारी असतील, अशाच केंदांची नियुक्ती करावी, जेणेकरून दिवसभरात एका केंद्रावर २५ ते ३० वाहनांना पाटी बसविली जाईल,’ असेही या वेळी बजावण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाच्या निर्देशांनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर वाहनचलाकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आत्तापर्यंत सव्वा लाखापेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनालाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ४० हजारांहून अधिक वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यात आली आहे. काही केंद्रांवर कुशल कामगारांचा अभाव असल्याने एका वाहनाला पाटी लावण्यासाठी एक तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे. अनेकांना तर मे महिन्यानंतरची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केंद्रे वाढविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. येत्या आठवडाभरात केंद्रांची संख्या ५०० पर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. -स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>

Story img Loader