लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ऐतिहासिक शनिवारवाडा आणि पाताळेश्वराच्या शंभर मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास केंद्र सरकारने मनाई केली आहे. त्याचा फटका परिसरातील असंख्य नागरिकांना बसत असून आमदार, खासदार, नगरसेवकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शहराचा विकास करताना ‘कसब्या’चा विसर राज्यकर्त्यांना पडल्याचा आरोप करत आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कसब्यातील एक लाख नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असे शनिवारवाडा कृती समितीच्या अनुपमा मुजुमदार यांनी जाहीर केले.

शनिवारवाडा, पाताळेश्वर मंदिर या वास्तू पुरातत्व विभागाच्या ‘अ’ श्रेणीत येतात. त्यामुळे या वास्तूंच्या शंभीर मीटर परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही. कसबा आणि शनिवारवाडा परिसरत दाट लोकवस्तीचा भाग आहे. या परिसरात जवळपास शंभर जुने वाडे आहेत. यातील काही वाडे पडले असून काही पडण्याच्या स्थितीत आहेत. केंद्र सरकारच्या या जाचक अटींमुळे या परिसरात बांधकाम करता येत नसल्याने कसब्याचा विकासालाही मर्यादा आल्या आहेत.

आणखी वाचा-हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा?

यासंदर्भात खासदार, आमदार, नगरसेवक, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्वांना शनिवारवाडा कृती समितीच्या वतीने सातत्याने निवेदने देण्यात आली आहेत. मात्र केंद्र सरकारकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलली जात आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले जाते. मात्र निवडणुकीनंतरही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे विकास नाही तर, मतदान नाही, अशी भूमिका कृती समितीने घेतल्याचे मुजुमदार यांनी सांगितले.