लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून ग्राहकांकडून फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे. टोमॅटो, मिरची, घेवडा, ढोबळी मिरचीच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (४ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून पावटा आणि घेवडा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ८ ते ९ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-शास्त्रज्ञांनी शोधले ३४ नवीन अतिविशाल रेडिओ स्रोत, जीएमआरटीच्या सहाय्याने संशोधन

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, टोमॅटो १० ते ११ हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, मटार ८ ते १० टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ५० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, मेथी, शेपूच्या दरात अल्पशी वाढ

पावसामुळे तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिर, मेथी, शेपू, राजगिरा, चवळईच्या दरात अल्पशी वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर होते. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिर एक लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ८०० ते १५०० रुपये, मेथी ८०० ते १२०० रुपये, शेपू ५०० ते ८०० रुपये, कांदापात ८०० ते १५०० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडई ३०० ते ६०० रुपये, पुदिना ४०० ते १००० रुपये, अंबाडी ५०० ते ८०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ८०० रुपये, चुका ५०० ते ८०० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक ८०० ते १५०० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.