पुणे : रेनकोटवरुन झालेल्या वादातून घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्य तरुणावर मित्राने चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी एकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली.आदित्य श्रीकृष्ण वाघमारे (वय २३, रा. कारी, ता. धारुर, जि. बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश परमेश्वर भिलारे (वय १८, रा. जाट नांदूर, ता. धारुर, जि. बीड) याला अटक करण्यात आली. याबाबत सिद्धेश्वर मोरे (वय २४, रा. वाल्हेकर चौक, नऱ्हे) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य आणि सुरेश मित्र आहेत. दोघेजण एका पिझ्झा विक्री करणाऱ्या उपहारागृहात कामाला आहेत. दोघेजण मूळचे बीड जिल्ह्यातील असल्यो मित्र आहेत. घरपोहोच पिझ्झा पोहोचविण्याचे काम दोघेजण करतात, तसेच रात्री ते खासगी कंपनीत काम करतात. रविवारी सकाळी दोघांमध्ये रेनकोटवरुन वाद झाला होता. रेनकोट न दिल्याने आरोपी सुरेश त्याच्यावर चिडला होता. त्यानंतर रविवारी रात्री दहाच्या सुमारास दोघे जण नऱ्हे भागातील झिल महाविद्यालयाजळ भेटले. रेनकोटवरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला. सुरेशने त्याच्याकडील चाकूने आदित्यवर वार केले. बरगडीवर चाकूने वार करण्यात आल्याने आदित्य गंभीर जखमी झाला.

हेही वाचा >>>पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार करून पसार झालेले सराइत गजाआड, सोलापूर परिसरात गुन्हे शाखेची कारवाई

गंभीर जखमी झालेल्या आदित्यला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.

Story img Loader