पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या शिवाजी आढळराव पाटील यांचा एक लाख ४० हजार ९५१ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा दिमाखात दिल्लीवर स्वारी केली. आढळराव यांना केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. त्यामुळे आढळरावांना राष्ट्रवादीच्या आमदारांनीच रोखले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाची उमेदवारनिहाय आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील बलाबल पाहिल्यास ‘काका विरुद्ध पुतण्या’ या लढाईत अजित पवार यांचीच ताकद जास्त दिसत होती. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदी – दिलीप मोहिते पाटील आणि हडपसरमधून चेतन तुपे असे चार आमदार अजित पवार गटाकडे आहेत.

हेही वाचा…शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला धोक्याचा इशारा; मताधिक्य घटल्याचा काँग्रेसला फायदा

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने या चारही विधानसभा मतदारसंघांसाठी त्यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा नियोजन समिती, आदिवासी योजना अशा विविध विकासकामांसाठी भरघोस निधी दिला होता. मात्र, त्याचा काही परिणाम मतदानावर झाला नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या पाच वर्षांपासून करणारे आढळराव यांनी ही जागा शिवसेनेकडून राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे नक्की झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, निकालाच्या आकडेवारीत एकमेव भोसरी विधानसभा मतदारसंघात आढळराव यांना साडेनऊ हजारांचे मताधिक्य मिळाले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव यांचा पराभव झाला असला, तरी भोसरी विधानसभा मतदारसंघातून ३७ हजार ७७, तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून ५३७० मतांची आघाडी मिळाली होती.

हेही वाचा…लसीकरणानंतर लहान मुलांना पॅरासिटामॉल द्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून योग्य मात्रा जाहीर; पुरेसा साठा ठेवण्याचेही निर्देश

शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांचे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

मतदारसंघ आढळराव कोल्हे

जुन्नर ५६,७२६ १,०८,११९

आंबेगाव ८२,०१९ ९३,३८७

खेड-आळंदी ७०,२८६ १,१६,५४९

शिरूर १,००,२८३ १,२८,०७२

भोसरी १,२७,३९५ १,१७,८२३

हडपसर १,२०,४२९ १,३३,८१८

टपाली ६०३ ९२४

एकूण ५,५७,७४१ ६,९८,६९२

हेही वाचा…पिंपरी : पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड शहर तुंबणार?

वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा

शिवसेना अखंड असताना आढळराव हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. तेव्हा देखील शिरूर लोकसभा मतदारसंघात अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतानाही सातत्याने आढळराव निवडून आले होते. तेव्हा देखील हीच चर्चा केली जायची. विरोधी पक्षातील आमदार असतानाही दुसऱ्यांदा खासदार झालेल्या कोल्हे यांच्यानिमित्ताने वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.