लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘राज्यातील दुष्काळ निवारण करण्यासाठी केवळ मोठी धरणे बांधणे आवश्यक नसून जलसंवर्धनाची कामे होणे गरजेचे आहे. २४ हजार गावे दुष्काळमुक्त होण्याच्या दिशेने काम करण्यात येत आहे. जलसंवर्धन केले गेले तरच शेतकरी आत्महत्या रोखल्या जाऊ शकतात’, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘जलयुक्त शिवार’ प्रकल्पाचे लोकचळवळीमध्ये रूपांतर  करण्याचे मोठे काम नाम फाऊंडेशनने केले, असा गौरव त्यांनी केला.

नाम फाउंडेशनच्या नवव्या वर्धापनदिन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सुरत येथील आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या वेळी उपस्थित होते.

आणखी वाचा-अजितदादांच्या आमदाराबाबत जनतेत नाराजी, महायुतीचा एक आमदार कमी होऊ नये यासाठी जागा सोडा; शिवसेनेची मागणी

फडणवीस म्हणाले, ‘केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकते असे काही जणांना वाटते. पण  नाना, मकरंद यांच्यासारखे लोक बदल घडवत असतात. वलय असलेली अनेक मंडळी देशात आहे. पण, या दोघांचे व्यक्तिमत्त्व असे आहे की ते सर्वांना आपले वाटतात. त्यांचा स्वार्थ नाही आणि ते खरे सांगत आहे असे लोकांना वाटून नाम फाउंडेशनच्या माध्यमातून लोकचळवळ उभी राहिली. एक हजारहून अधिक गावात त्यांनी काम केले. लोकांना प्रेरित करून त्यांच्यामाध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण करणे हे नेतृत्वाचे काम करताना नाम फाउंडेशनने समाजाचे परिवर्तन घडवू शकतो हे दाखवून दिले आहे.’

मंत्रिमंडळासारखे अनेक खात्यांचे काम करून नाम फाउंडेशनने समाजामध्ये बदल घडवून आणला आहे, असे सांगून सामंत म्हणाले, माझ्या मतदारसंघातील गौतमी नदीचा गाळ नाम फाउंडेशनने काढला. त्याचा परिणाम असा झाला की चांगला पाऊसही होऊनही पावस गाव पाण्याखाली गेले नाही. तीन वर्षांपूर्वी चिपळूणमधील सावित्री नदीला आलेला पूर सर्वांनीच पाहिला होता. मात्र, नाम फाउंडेशनच्या कामानंतर तेथे पूर आला नाही. समाजाच्या उत्कर्षाचा परमार्थ साधणाऱ्या नाम फाउंडेशनला उद्योगांनी सामाजिक उच्चरदायीत्व निधी (सीएसआर) द्यावा, अशी सूचना उद्योगमंत्री म्हणून सर्वांना करतो.

आणखी वाचा-अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा कर्वेनगरमध्ये खून

नाना पाटेकर यांचे मार्गदर्शन घेऊन जलशक्ती मंत्रालयाद्वारे चांगले काम करू, असे पाटील यांनी सांगितले. देशातील महिलांना पाणी भरण्यासाठी दररोज साडेपाच कोटी तास खर्च करावे लागत होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘नल से जल‘ योजनेद्वारे घरातील नळाला येणाऱ्या पाण्यामुळे महिलांच्या वेळेत बचत झाली आहे. त्याचा उपयोग मुलांचे शिक्षण तसेच कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याकरिता होत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘नद्या जोड प्रकल्पां’तर्गत २० नद्यांच्या जोडणीचे काम सूरू झाले आहे.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंशत: अंमलबजावणी झाली आहे. ती पूर्णपणे केली तर शेतकरी म्हणून आम्ही कृतज्ञ राहू. मग, वारंवार कर्जमाफी देण्याची मागणी करावी लागणार नाही. -नाना पाटेकर, संस्थापक, नाम फाउंडेशन

भाषणाची सवय बदलण्यास नाना कारणीभूत

पूर्वी मला आवेशाने भाषण करण्याची सवय होती. माझे भाषण झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला नानांचा दूरध्वनी यायचा. ‘देवेंद्र छान बोललास. पण, असा बोलशील तर हाट्र ॲटॅक येईल. जरा शांतपणे बोल ना’, असा सल्ला त्यांनी मला दिला. माझी भाषणाची सवय बदलण्यास भाग पाडणारे नाना आहेत. मी शांतपमे बोलताना तुम्हाला दिसतो तो केवळ नानांमुळेच, असे सांगत फडणवीस यांनी पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू उलगडला.