कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक चुरशीची ठरत आहे. या जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपा-शिंदे गटाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात आहे. मतदानाला फक्त दोन दिवस शिल्लक राहिल्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी प्रचार मोहिमेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. त्यांनी आज कसबा मतदारसंघात प्रचारसभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला. चुकीचे कथानक रचण्याचा प्रयत्न केला तरी, त्याचा उपयोग होणार नाही. ही लढाई आता धंगेकर आणि रासने अशी नसून राष्ट्रीय विचाराचे आणि कलम ३७० ला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये ही लढाई आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.

हेही वाचा >> खेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! MPSCचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार; आयोगाने घेतला निर्णय

ही भाजपा-काँग्रेसची लढाई नसून

“हा जो कसबा आहे तो हिंदुत्ववादी आहे. हे पुणे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे. शिवाजी महाराजांच्या पुण्यात देशभक्तांचा मेळा पाहायला मिळतो. मला विश्वास आहे की, कोणी कसेही कथानक रचण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ही भाजपा-काँग्रेसची लढाई नसून ही रासने-धंगेकर अशी लढाई असल्याचे म्हणण्यात आले,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> “मी असंच सगळं बाहेर आणणार,” पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले “मी बोललो की…”

राष्ट्रवादीच्या नेत्याने जातीवादी टिप्पणी केली

“काल शरद पवार यांनी एक बैठक घेतली. याच बैठकीत त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याने जातीवादी टिप्पणी केली. मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हरवण्यासाठी देशभरातून मुस्लीम मतदाराला आणू. तसेच मेलेला मुसलमानदेखील येथे मतदान करायला येईल, असे हा नेता म्हणाला. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा लक्षात घ्या, की ही लढाई धंगेकर किंवा रासने अशी नाही. ही लढाई राष्ट्रीय विचारांचे लोक आणि ज्यांचा काश्मीरला विरोध आहे, या लोकांमध्ये आहे,” असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचे संजय राऊतांवर टीकास्र; म्हणाले, “ते दुर्दैवाने एका…”

ही लढाई एका मतदारसंघाची असली तरी…

“उद्या काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही. मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाच तर त्याला विचारा पुण्येश्वर महादेवबद्दल तुझी काय भूमिका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने त्यांची पुण्येश्वर महादेवाबद्दलची आपली भूमिका सांगितली पाहिजे. ही लढाई एका मतदारसंघाची असली तरी ही लढाई वैचारिक झाली आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> Video : कोर्टात कुस्ती, बाहेर दोस्ती! सत्तासंघर्षादरम्यान अनिल परब-राहुल शेवाळेंमध्ये रंगल्या गप्पा; एकत्र फोटोसेशन

“लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून लांगूलचालन करून निवडून येऊ, असा त्यांना विश्वास वाटतो. मात्र अठरापगड जातीचे लोक भाजपासोबत आहेत. कारण आम्ही छत्रपतींचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे, महात्मा जोतिबा फुलेंचा विचार सांगणाारे आहोत. पुण्याच्या विकासाचा रथ भाजपा पुढे नेण्याचे काम करत आहे,” असे म्हणत फडणवीसांना मतदारांनी भाजपाला मत द्यावे, असे आवाहन केले.

Story img Loader