पुण्यात गेल्या महिन्यात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाची मोठी चर्चा राज्यभर पाहायला मिळाली. विशेषत: राजकीय वर्तुळात यासंदर्भात बरेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यापासून पोलीस स्थानकात आरोपीला पिझ्झा-बर्गर खायला देण्यापर्यंत अनेक बाबींवर दावे-प्रतिदावे करण्यात आले. राज्य सरकारकडून आरोपीला अभय दिलं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यासंदर्बातला मुद्दा आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे सुरेश प्रभू यांनी उपस्थित केल्यानंतर त्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर निवेदन दिलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी घटना घडली तेव्हापासूनचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. “हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. ही घटना १९ मे २०२४ रोजी रात्री अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर त्या मुलाला लोकांनी थोडी मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलीस स्थानकात आणलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो ३०४ अ होता. पण त्यानंतर वरिष्ठांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की ३०४ अ नव्हे, ३०४ चाच गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यामुळे त्याच दिवशी केस डायरीमध्ये ३०४ चा गुन्हा दाखल केला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर दाखल अर्जात स्पष्टपणे बाजू मांडण्यात आली आहे. ‘संबंधित मुलाचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं असून त्यानं निघृणपणे सदरचं कृत्य केलं आहे. त्याची जन्मतारीख १४ सप्टेंबर २००६ असून त्याचं वय १७ वर्षं ८ महिने इतकं झालं आहे. त्याच्या वयाचा विचार करता त्याला प्रौढ समजून ते न्यायालयाकडे वर्ग करावे अशी विनंती आहे’, असं पोलिसांनी त्या अर्जात म्हटलं आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला दिली.

फडणवीसांनी सभागृहात निर्भया प्रकरणाचा दिला दाखला!

‘निर्भयाच्या घटनेनंतर १७ वर्षांच्या वरचे जे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केल्याचं लक्षात आलं तर त्यांना प्रौढ मानता येतं याबाबतची तरतूद आहे. त्यानुसारच ही मागणी करण्यात आली होती. त्या बोर्डाच्या सदस्यांनी तो अर्ज दाखल करून घेतला. त्यानंतर त्याला काय शिक्षा दिल्या हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यावर अपील दाखल केली. न्यायालयाने पोलिसांना सांगितलं की तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे. त्यासाठी आम्ही बोर्डाकडे याचिका दाखल केली, तेव्हा त्यांनी आपला जुना निर्णय बदलला आणि आरोपीला कोठडी दिली”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“…तेव्हा पोलिसांना काहीतरी गडबड वाटली”

“आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. जेव्हा त्या नमुन्यामध्ये अल्कोहोल नसल्याचं लक्षात आलं, तेव्हा पोलिसांना त्यात काही गडबड असल्याचं दिसलं. तेव्हा पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए, त्याच्या वडिलांचा डीएनए आणि रक्ताच्या नमुन्याचा डीएनए तपासला. तो मॅच होत नसल्याचं समोर आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित डॉक्टरांना अटक केली. त्यात एकानं ३ लाख रुपये घेऊन नमुना बदलल्याचं कबूल केलं”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केल्याचं सांगितलं.

Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live: “…तर मी अजित पवारांचाच धिक्कार करतो”, विधानभवनाबाहेर जितेंद्र आव्हाडांची आगपाखड!

मुलगा ११० किलोमीटर प्रतीतास वेगानं कार चालवत होता

“पहिलं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आलं. मुलानं जेव्हा ब्रेक मारला, तेव्हा लॉक झालेला वेग ११० किलोमीटर प्रतीतास एवढा आहे. त्यामुळे अत्यंत वेगानं तो कार चालवत होता. त्याच्या घरापासूनचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. तो आधी ज्या बारमध्ये बसला, जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त करण्यात आलं आहे. दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला, त्याचं सीसीटीव्ही फूटेज जप्त झालं आहे. त्यामुळे पुराव्यांमध्ये कुठेही कमतरता नाहीये”, असंही फडणवीस म्हणाले.

“त्याच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. वडिलांनी मुलगा प्रौढ नसताना त्याला गाडी चालवायला देणं, या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. बार चालकांवरही कारवाई झाली आहे. त्याच्या आजोबांनी त्यांच्या ड्रायव्हरला हा गुन्हा अंगावर घेण्याची गळ घातली. पण पोलिसांनी ड्रायव्हरचं ऐकलं नाही. त्या आजोबांनी ड्रायव्हरला एक दिवस घरात कोंडूनही ठेवलं. पण त्यानं काही त्यांचं ऐकलं नाही. वडिल आणि आजोबांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ते अजूनही अटकेत आहेत”, असं ते म्हणाले.

Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत

पोलिसांचं चुकलं कुठे?

दरम्यान, यावेळी फडणवीसांनी पोलिसांची चूक कुठे झाली तेही सांगितलं. “पहिली चूक ही आहे की जेव्हा त्याला रात्री ३ वाजता पोलीस स्थानकात आणलं तेव्हा त्याला लगेच वैद्यकीय चाचणीसाठी पाठवायला हवं होतं. पण त्यांनी सकाळी साडेआठला पाठवलं. दुसरं, असा गुन्हा घडला की साधारणपणे अपघातप्रकऱणात ३०४ अ लावतात. पण त्यावेळी त्यांनी वरीष्ठांना आधी कळवायला हवं होतं. पण ते त्यांनी केलं नाही. वरीष्ठांनी तो ३०४ करायला लावला. त्यामुळे ड्युटी व्यवस्थित केली नाही यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

“पुण्याच्या परिसरात ७० पब्जवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यानी परवान्याच्या अटी-शर्थींचं उल्लंघन केलं आहे, अशा ७० पब्जचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ज्यांचे परवाने आहेत, तिथे कॅमेरे लावले आहेत. ज्यातून त्यांनी किती वाजता पब बंद केला, गिऱ्हाइकांना दारू देताना त्यांचं वय तपासलं आहे की नाही या बाबी तपासल्या जात आहेत. प्रवेश देतानाही गिऱ्हाईकाच्या वयाचा दाखला तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर उद्या वय न तपासता प्रवेश दिला, तर परवाना रद्द करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत”, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.