पेपरमध्ये फोटो येणार म्हणून मदत करायला आला असाल तर येऊच नका, आम्हाला कायम स्वरूपी अशी ठोस मदत करा असं म्हणत पुण्यातील दांडेकर पूल भागातील नागरिकांनी आपला संताप आणि रोष व्यक्त केला. पुण्यातील दांडेकर पूल भागात मुठा कालव्याला भगदाड पडल्याने चारशेहून जास्त कुटुंबांचे संसार पाण्यात वाहून गेले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी आले होते त्यांनाच येथील नागरिकांनी खडे बोल सुनावले आहेत. नागरिकांचा वाढता रोष पाहून गिरीश महाजन यांनी तिथून काढता पाय घेतला.
गुरुवारी ही घटना घडली तेव्हापासून नेते मंडळी केवळ पाहून जात आहेत.आम्हाला कायम स्वरूप मदत होईल.अशा स्वरूपाची मदत करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.केवळ उद्या पेपरमध्ये तुमचे फोटो येणार असतील तर येऊ नका अशा शब्दात गिरीश महाजनांसमोर रोष व्यक्त केला.
त्यावर महाजन म्हणाले की,सरकारकडून सर्वाना मदत केली जाईल.सरकारच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही.याची काळजी घेतली जाणार आहे.त्या स्वरूपाचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यानी सांगितले.मात्र नागरिक त्याचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते.समोरील नागरिकांचा रोष पाहता. त्यांनी घटनास्थळापासून निघणेच पसंत केले.