पुणे : महिला, शाळकरी मुलींवर होणारे अत्याचारांची प्रकरणे फक्त पोलिसांपुरती मर्यादित नाही. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी केली.

महिला, तसेच शाळकरी मुलींवर अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर डाॅ. गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर डाॅ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अत्याचाराचा घटना घडल्यानंतर राजीनामा, निलंबनाची मागणी केली जाते. अशा प्रकरणात कोणाचाही राजीनामा घेण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचार हा फक्त पोलिसांपुरता मर्यादित विषय नाही. त्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. बोपदेव घाटात तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. बोपदेव घाटात कायमस्वरुपी पोलीस चौकी सुरु करण्यात यावी, तसेच पाेलिसांनी नियमित गस्त घालावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बोपदेव घाटासह दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसरात पोलिसांनी नियमित गस्त घालावी, असे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शर्ट नीट न खोचल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; स्वारगेट पोलिसांकडून शिक्षकाविरुद्ध गुन्हा

महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात येते. महिलांच्या तक्रारींचा निपटारा झाला आहे का? याबाबतचा अहवाल तयार करण्यात यावा. महिलांच्या तक्रारींची वेळ निराकरण केले तर संभाव्य गंभीर गु्न्ह्यांना वेळीच आळा बसेल. पुणे पोलिसांनी महिलांसाठी भरोसा सेल, ज्येष्ठ नागरिक कक्ष सुरु केले आहेत. या कक्षाच्या माध्यमातून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची निराकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

व्हॅनचालकांची चारित्र्य पडताळणी करण्याची सूचना

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली. शाळांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचालकांची चारित्र्य पडताळणी करुन घ्यावी. त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना डाॅ. नीलम गोेऱ्हे यांनी केली.

हेही वाचा >>>Ajit Pawar : “प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा, अजित पवारांनी भर सभेत टोचले कान; म्हणाले, “जरा…”

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरजच नाही.

महिला, तसेच शाळकरी मुलींवर अत्याचार किंवा गंभीर घटना घडल्यास गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करत आहे. अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यासाठी ते स्वत: पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.