पुणे : तापमान बदलामुळे जगभरात ऋतुचक्रात अनेक बदल घडत आहेत. तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमान यातील मोठ्या चढउतारांमुळे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होऊन हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक हिवताप अहवालातून हे सत्य समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक आरोग्य संघटनेने वार्षिक हिवताप अहवाल जाहीर केला आहे. त्यात प्रामुख्याने तापमान बदलामुळे हिवतापाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार, मागील वर्षी जगभरात २ कोटी ४९ लाख जणांना हिवतापाचा संसर्ग झाला. त्याआधीच्या वर्षापेक्षा ही रुग्णसंख्या सुमारे ५० लाखांनी अधिक आहे. हिवतापाचा प्रतिबंध करण्यात औषधे आणि कीटकनाशकांचा प्रतिरोध, मानवी संकटे, अपुरी साधने, तापमान बदलाचे परिणाम ही मुख्य कारणे आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या पाकिस्तान, इथियोपिया, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या देशांमध्ये आहे.

आणखी वाचा-मार्गशीर्ष महिन्यात कांदापातीला मागणी वाढणार; कांदापात आतापासूनच तेजीत

तापमान बदलामुळे तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमानात मोठे चढउतार होत आहेत. यामुळे हिवतापाच्या विषाणूचे वाहक असलेले ॲनाफिलस डासांचे जीवनचक्र बदलले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पाकिस्तानमध्ये मागील वर्षी आलेल्या भीषण पुरानंतर तेथील हिवतापाच्या रुग्णांची संख्या तब्बल पाच पटीने वाढली होती. याचबरोबर तापमान बदलामुळे हिवतापाच्या संसर्गाचे प्रमाणही वाढत आहे.

तापमान बदलामुळे बिघडलेल्या ऋतुचक्राचा फटका हिवताप नियंत्रणाला बसत आहे. डासांचा प्रतिबंध करणारी औषधे व इतर साधनसामग्री पोहोचविण्यास नैसर्गिक आपत्तीच्या काळात अडचणी येत आहेत. मच्छरदाणी, औषधे आणि लस यांसारख्या आवश्यक गोष्टीही रुग्णांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने हिवतापाचा धोका आणखी वाढत आहे. त्यामुळे हिवतापाचा धोका अधिक असलेल्या भागात तापमान बदलाबद्दल ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. जागतिक तापमानवाढ आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी तातडीने कृती करण्याची वेळ आली आहे, असे संघटनेचे महासंचालक डॉ. टेडरॉस ॲडहानोम घेब्रेयसिस यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-पुणेकरांची पसंती परवडणाऱ्या घरांना! नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत ५५ टक्के वाटा

यंदा मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या

राज्यात यंदा हिवतापाचे १४ हजार २२१ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक ६ हजार ४९८ रुग्ण आहेत. त्याखालोखाल गडचिरोलीत ५ हजार ३३ रुग्ण आहेत. राज्यातील ८१ टक्के रुग्ण या दोन जिल्ह्यात आढळून आले आहेत.

तापमानात वाढ झाल्यास डासांचे आयुर्मान वाढते. पाऊस जास्त झाल्यास डासोत्पत्ती ठिकाणे वाढतात. पाऊस कमी झाल्यास पाण्याची टंचाई होऊन अनेक भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवले जाते. अशा भांड्यातूनही डासांची उत्पत्ती वाढते. तसेच, दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक वाढल्यासही डासांची उत्पत्ती वाढते. यामुळे तापमान बदल हे डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरत आहेत. -डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effect of temperature change life expectancy of mosquitoes increased the risk of malaria pune print news stj 05 mrj