पिंपरी- चिंचवड : हिंदुत्वाला, शिवसेनेला, बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी डॅमेज केलं. त्यांनी आता डॅमेज कंट्रोल बैठका घेऊन काय फायदा? अस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. एकनाथ शिंदे हे पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या संघर्ष पुरुष पुस्तकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार शंकर जगताप यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विधानसभेत ज्याप्रमाणे आम्हाला विजय मिळाला. तसाच आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होईल. असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांचा अनेक जण पक्ष सोडत आहेत. दोन-चार माणसं सोडली तर कोणीही खुश नाही. असा खोचक टोला भास्कर जाधव यांच्या नाराजीनंतर एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा कार्यकर्ते, नेते आपल्याला का सोडून जात आहेत? याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं. अशी टीका यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. जो विकास विरोधी आहे. त्याला कार्यकर्ते सोडून जात आहेत. आमच्या पक्षात स्वतःहून अनेक जण येत आहेत. आमचं हे टायगर ऑपरेशन वगैरे काही नाही. असे स्पष्टीकरण देखील एकनाथ शिंदे यांनी दिलं.
तसेच दिल्लीतील घटना ही दुर्दैवी आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिल्लीच्या घटनेवरून एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.