२६ प्रश्न रद्द करण्याचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत २६ प्रश्न चुकल्याचे आढळून आले. तांत्रिक कारणांनी चुका झाल्याचे सांगून या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत परीक्षा परिषदेने हे प्रश्नच रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राज्यभरात २४ फेब्रुवारीला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा झाली. त्यात पाचवीसाठी ५ लाख १२ हजार  ६६७, तर आठवीसाठी ३ लाख ५३ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ५ हजार ८६९ केंद्रांवर मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, सिंधी, तेलगू, कन्नड या सात माध्यमांमध्ये ही परीक्षा झाली. मात्र, या परीक्षेत पाचवीच्या परीक्षेत १३ आणि आठवीच्या परीक्षेत १३ प्रश्न चुकीचे असल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिका १ आणि प्रश्नपत्रिका २ अशा दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये मिळून एकूण २६ प्रश्न चुकीचे होते. त्यामुळे हे प्रश्नच रद्द करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला.

‘तांत्रिक कारणांनी हे प्रश्न चुकले आहेत. त्या छपाईच्या, भाषांतरातील या चुका आहेत. तरीही या चुका का झाल्या याचे विश्लेषण करण्यात येत आहे. चुकलेले प्रश्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  सर्व विद्यार्थ्यांसाठी समानता राहील. प्रश्न चुकले म्हणून सरसकट गुण न देता ते वगळून उर्वरित प्रश्नांचे मूल्यमापन करून गुण दिले जातील,’ असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

अंतरिम उत्तरसूची प्रसिद्ध

परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकांची अंतरिम उत्तरसूची राज्य परीक्षा परिषदेच्या  https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हे आक्षेप ऑनलाइन स्वरूपातच नोंदवावे लागणार आहेत. त्या बाबत संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध केली जाईल.