पुणे : मराठवाडा वगळता उर्वरित राज्यातील धरणे काठोकाठ भरली आहेत. राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा २९९७ प्रकल्पांमधील पाणीसाठा ७९.९२ टक्क्यांवर गेला आहे. मराठवाड्यातील धरणे मात्र निम्मी भरली आहेत.

पुणे विभागातील ७२० प्रकल्पांमधील पाणीसाठा ८९.९९ टक्क्यांवर गेला असून, धरणांमध्ये १६८५४.७१ दलघमी पाणीसाठा झाला आहे. जुलै, ऑगस्टमधील पावसाने पुणे विभागाला चांगला आधार मिळाला आहे. विदर्भात सुरुवातीला मोसमी पावसाने ओढ दिली, पण जूनअखेरीपासून ऑगस्टअखेरपर्यंत सर्वदूर दमदार पाऊस झाल्यामुळे विदर्भातील धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत.

हेही वाचा – देशातून ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंब निर्यात; जाणून घ्या, नेमकं काय घडलं, संधी काय?

नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ८१.६८ टक्क्यांवर गेला असून, धरणांमध्ये ४७४६.८६ दलघमी पाणीसाठा झाला आहे. अमरावती विभागातील २६४ प्रकल्पांमधील पाणीसाठा ७८.६१ टक्क्यांवर गेला असून, एकूण पाणीसाठा ३७४८.१६ दलघमी झाला आहे. नाशिक विभागात जुलै, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे ५३७ धरण प्रकल्पांमध्ये ७४.९१ टक्के पाणीसाठा झाला असून, एकूण पाणीसाठा ५२६१.६१ दलघमी झाला आहे. कोकण विभागातील धरणे ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरली आहेत. १७३ प्रकल्पांमध्ये ९३.०१ टक्के पाणीसाठा झाला असून, एकूण पाणीसाठा ३६१४.१२ दलघमी इतका झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील पाणीसाठा ५५.८१ टक्क्यांवर

छत्रपती संभाजीनगरमधील ९२० प्रकल्पांमधील पाणीसाठा २ सप्टेंबरपर्यंत जेमतेम ५५.८१ टक्क्यांवर गेला आहे. धरणांतील एकूण पाणीसाठा ५८९६.८२ दलघमी झाला आहे. विभागातील मोठ्या ४४ प्रकल्पांतील पाणीसाठा ६९.१५ टक्क्यांवर असून, पाणीसाठा ४५५१.७३ दलघमी झाला आहे. मध्यम स्वरूपाच्या ८१ प्रकल्पांतील पाणीसाठा ४५.२० टक्क्यांवर असून, धरणांत ६३४.१२ दलघमी पाणीसाठा आहे. लहान ७९५ प्रकल्पांमध्ये जेमतेम २७.२८ टक्के पाणीसाठा असून, धरणांतील पाणी ७१०.९६ दलघमी इतके आहे.

हेही वाचा – pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार

मराठवाड्यात दोन दिवसांत ४८१ दलघमी पाणीसाठा

गेल्या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यामध्ये प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार म्हणजे सरासरी १५० मिलिमीटर पाऊस पडला आहे. प्रामुख्याने ऊर्ध्व पेनगंगा (ईसापूर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रविवारी २४२ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणांत तब्बल पावणे ५४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात दोन दिवसांत ४१ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दोन दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात ४८१ दलघमी (१७ टीएमसी) इतकी वाढ झाली आहे. अजूनही पाऊस सुरू असल्याने मराठवाड्याच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी यांनी दिली.