लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात संशोधक विद्यार्थ्यांवर इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत कमी निधी खर्च केला जातो. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारने अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती देण्याची आवश्यकता आहे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी येत्या १० जानेवारीला चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, परीक्षा न घेता सरसकट शिष्यवृत्ती देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे. या मागणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून गडकरी यांना निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पाटील यांना पत्र दिले आहे.

आणखी वाचा-खरेदीच्या बहाण्याने दागिन्यांची चोरी; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

गडकरी यांच्या पत्रानुसार, पीएच.डी. करणाऱ्या प्रत्येक संशोधकाला समाजातील, देशातील प्रमुख अडचणी, दुखणी, कमतरता यावर शास्त्रशुध्द संशोधन, विदा संकलन करून संशोधनाची मांडणी करावी लागते. दोन शोधलेख, संधोधन लेखन यासाठी पीएच.डी. करणाऱ्यांना मेहनत घ्यावी लागते. मात्र, बार्टी, सारथी, महाज्योतीसारख्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. या विद्यार्थ्यांना राज्य सरकारद्वारे सरसकट शिष्यवृत्ती देणे गरजेचे आहे. मात्र पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader