नवी दिल्ली : टाळ-मृदुंगाचा गजर, ढोल-ताशांचा निनाद, माय मराठीचा जागर, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या लोककलाकारांच्या सादरीकरणाने राजधानी दिल्ली शुक्रवारी दुमदुमली. संसद भवन ते साहित्य भवन मार्गावर ग्रंथदिंडीचा दिमाखदार सोहळा तालकटोरा स्टेडियमवर पोहोचताच सर्वांच्या आनंदाला उधाण आले होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ‘अमृताते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिकें मेळवीन’ ही ओवी, तसेच कवी कुसुमाग्रजांच्या ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ या ओळी चित्ररथावर साकारल्या होत्या. सरस्वतीचे चिन्ह, संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, वीणा यांची प्रतिकृती तसेच ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिकांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती, छायाचित्रे अशा सांस्कृतिक ठेव्यातून अभिजात मराठी भाषेची गुढी उभारण्यात आली होती.
अंबारीच्या चित्ररथातून ही दिमाखदार शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशाचा गजर, आदिवासी नृत्य, लेझीम पथक, विविध महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेले रसिक यांचा या शोभायात्रेत विशेष सहभाग होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पारंपरिक मराठी वेशभूषेतील स्त्री-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. चित्ररथाची संकल्पना महाराष्ट्र शासनाची होती.
पंचक्रोशी मावळ हवेली तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या घोरावडेश्वर डोंगर प्रासादिक दिंडीने टाळ, मृदंग, वीणेसह धरलेल्या तालावर साहित्यप्रेमी दंग झाले. दिंडीपुढे डोक्यावर तुळस घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी मराठी संस्कृतीची ओळख दर्शविताना फुगडीचा फेर धरला, तर कल्याणच्या लेझीम पथकाने बहारदार लेझीम सादर केले. युवक-युवतींनी आदिवासी नृत्य केले. सार्थ तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, दासबोध आणि भारताचे संविधानाने ग्रंथदिंडीतील पालखीची शोभा वाढवली.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकेसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी करणाऱ्या टोप्या घालून सीमा भागातील मराठी बांधव साहित्य ग्रंथदिंडीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दिल्लीतील अमराठी रसिकांनी ढोल-ताशा वादन, तसेच गोंधळींच्या सादरीकरणाच्या तालावर केलेले भांगडानृत्य विशेष आकर्षण ठरले.
दिल्लीच्या प्रशस्त मार्गांवरून निघालेला हा पालखी सोहळा डोळ्यांत साठविण्यासोबतच आपापल्या मोबाइलमध्ये कैद करण्याचीही चुरस दिल्लीकरांत दिसून आली. रस्त्याच्या दुतर्फा झालेली लोकांची गर्दी, वाहने पांगवताना वाहतूक पोलीसांनीही या पालखी सोहळ्याचा आनंद लुटला. या वेळी दिल्ली पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन आणि संयोजन करण्यात आले होते.
संसद भवन ते तालकटोरा मैदानादरम्यान काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नावाने असलेले ग्रंथनगरीचे प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासमोर साहित्यप्रेमी आदराने नतमस्तक होत होते. या प्रसंगी दिल्लीस्थित राम मीना या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुरेख रेखाचित्र काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप येथे संमेलनाचे ध्वजारोहण महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, निमंत्रक संजय नहार, नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, साहित्यसंमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजन लाखे, सुनीताराजे पवार, ॲड. प्रमोद आडकर, विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.