पुणे : राज्यभरात जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा ६६.६७ टक्क्यांवर गेला आहे. मराठवाड्यातील धरणांत जेमतेम २५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाडा वगळता राज्याच्या उर्वरित भागातील धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये सुमारे ६६.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ४८२५४.८३ दलघमी असून, ३४६५९.७२ दलघमी पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठ्यात कोकण विभाग आघाडीवर आहे. कोकणातील धरणांमध्ये सरासरी ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ३८६७.६८ दलघमी असून, पाणीसाठा ३४६१.९६ दलघमी इतका झाला आहे.

पुणे विभागातील धरणांमध्ये ८२.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची पाणी साठवण क्षमता १८३४५.८६ दलघमी असून, पाणीसाठा १५६७७.३८ दलघमी इतका झाला आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये ६०.८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची साठवण क्षमता ६८१०.५४ दलघमी असून, पाणीसाठा ४४१६.०७ दलघमी झाला आहे.

हेही वाचा…आमदार, खासदारांची निवृत्तीवेतन बंद करा; भारतीय जवान किसान पार्टी, शेतकरी संघटनेची मोर्चाद्वारे मागणी

नागपूर विभागात ७४.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणांची साठवण क्षमता ५५७८.६१ दलघमी असून, पाणीसाठा ४३९५.१४ दलघमी झाला आहे. अमरावती विभागात ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणी साठवण क्षमता ४५५६.५२ दलघमी असून, पाणीसाठा ३११३.५३ दलघमी इतका झाला आहे.

हेही वाचा…लोणावळा: मद्यधुंद पर्यटक २०० फुट उंच डोंगरावरून पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उतरला! मित्रांसोबत झाला होता किरकोळ वाद

मराठवाड्यातील धरणांत २५ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर विभागातील म्हणजेच मराठवाड्यातील धरणांमध्ये जेमतेम २५.५२ टक्के पाणीसाठा झाला आहे. विभागातील सर्व धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ९०९५.६३ दलघमी असून, ३५९५.६४ दलघमी पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील ४४ मोठ्या धरणांमध्ये २७.१९ टक्के. ८१ मध्य प्रकल्पांत २८.६८ टक्के आणि ७९५ लहान प्रकल्पांत १९.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ४४.६७ टक्क्यांवर गेला आहे. नांदेड येथील विष्णुपुरी धरण तुडुंब भरले आहे. उर्वरित धरणांमध्ये अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.