पुणे : राज्यात आठवडाभर मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे. राज्यभरात खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. ऐन सुगीत पाऊस पडणार असल्यामुळे हा पाऊस मोठा नुकसानकारक ठरणार आहे. खरिपातील शेतीमाल मातीमोल होण्याची भीती आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण म्यानमार आणि बंगालच्या खाडीत वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून, त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोमवारपासून (२३ सप्टेंबर) शनिवारपर्यंत (२८ सप्टेंबर) राज्यात सर्वदूर दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: भोसरी मतदारसंघ तुतारीला? शिवसेना ठाकरे गटाने घेतला हा मोठा निर्णय

विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्यामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. सोमवारी राज्यभराला पावसासाठी पिवळा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूर, बीड, नगर, नांदेड, हिंगोली, परभणी, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

शेतीमालाच्या मोठ्या नुकसानीची भीती

राज्यात खरिपातील पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. ऐन सुगीचे दिवस सुरू आहेत. प्रामुख्याने कडधान्ये, सोयाबीन काढणी हंगाम सुरू आहे. आठवडाभर वादळी वाऱ्यासह दमदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस वेचणीला आला आहे. अनेक ठिकाणी वेचणी सुरू झाली आहे. हा कापूस भिजल्यामुळे दर्जा खालविणार आहे. सोयाबीनचे क्षेत्र ५० लाख हेक्टरहून जास्त आहे. हा सर्व सोयाबीन आता काढणीला आला आहे. मजुरांचा आणि मळणी यंत्रांचा तुटवडा आदी कारणांमुळे पाऊस पडण्याअगोदर शेतीमालाची काढणी करून सुरक्षित साठवणूक करणे शक्य नाही. त्यामुळे खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

हेही वाचा – ‘सीटीईटी’ लांबणीवर.. आता कधी होणार परीक्षा?

राजस्थान, कच्छमधून आज माघार शक्य

दक्षिण राजस्थान, कच्छच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सोमवारपासून (२३ सप्टेंबर) सुरू होण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थानवर हवेची प्रतिचक्रीय (प्रत्यावर्ती) स्थिती तयार झाली आहे. हवेतील बाष्पाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे सोमवारपासून नैऋत्य मोसमी वाऱ्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. पण, कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असल्यामुळे परतीच्या प्रवासात अडथळे येऊन परतीचा प्रवास रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सानप यांनी व्यक्त केली. दरम्यान राज्याच्या अनेक भागात स्थानिक पातळीवर तापमान वाढून दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला आहे.