लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अखत्यारित असलेल्या मावळ तालुक्यातील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याबाबत गृह विभाग सकारात्मक नाही. लोणावळ्यात पर्यटक पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लोणावळा शहर पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. सुरुवातीला आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली, रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. काही महिन्यांपूर्वी वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या आयुक्तालयांतर्गत आता २२ पोलीस ठाणी आहेत. आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यात अपयश येत असतानाच ग्रामीण हद्दीतील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार ठाणी पिंपरी आयुक्तालयाला जोडण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला.

लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील अपघात, घातपात आणि अन्य घटनांमध्ये ग्रामीण पोलिसांना मदत उपलब्ध करून देण्यात उशीर होतो. त्यामुळे या भागात कायदा-सुव्यवस्थेसंबंधी अनेक आव्हाने आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या नियंत्रणाखाली आणल्यास या समस्या अधिक प्रभावीपणे हाताळता येतील, असा दावा केला. परंतु, लोणावळा पिंपरीत घेण्यास शासन सकारात्मक नाही. ग्रामीण भाग कशासाठी पाहिजे? शहर पोलिसांना ग्रामीण भागात गस्त घालणे शक्य होणार नाही. त्यासाठी स्वतंत्र पर्यटक पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे शासनाने स्पष्ट केले.

पिंपरी आयुक्तालयाची हद्द सर्वाधिक

पिंपरी आयुक्तालयाचे एकूण क्षेत्रफळ ११५ चौरस किमी इतके असून, अंदाजे ४० लाख इतकी लोकसंख्या येते. पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीणपेक्षा भौगोलिकदृष्ट्या पिंपरी-चिंचवडची हद्द मोठी आहे. पिंपरी-चिंचवड शहर, पुण्यातील बावधन, बालेवाडी, ग्रामीणमधील चाकण, खेड, आळंदी, तळेगाव दाभाडे हा परिसर आयुक्तालयांतर्गत येत आहे.

तपासात अडचणी

आळंदी-मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे ही औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अखत्यारित येतात. आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा ग्रामीण भाग येतो. या भागात पायाभूत सुविधा, ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात अडचणी येतात.

गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचा पोलिसांचा दावा

ग्रामीण भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त वाढविली आहे. ग्रामरक्षक दलाचीही मदत होते. आयुक्तालयात ग्रामीण भाग आल्याने मनुष्यबळ वाढते. तडीपार, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत ग्रामीण भागात १३०० गुन्ह्यांनी घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण ही चार पोलीस ठाणी पोलीस आयुक्तालयाशी जोडण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. तो शासनाकडे प्रलंबित असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.

Story img Loader