पुणे : अरबी समुद्रावरून किनारपट्टीच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वेगाने येत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीपासून केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगाल उपसागरात दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भावर आहे. हवामान विषयक ही स्थिती राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्यास पोषक आहे.

हेही वाचा…पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाची उच्चांकी पातळी, जूनमध्ये १५.९० टक्के मिश्रण

अरबी समुद्रावरून किनारपट्टीवर बाष्पयुक्त वारे वेगाने येत आहेत. त्यामुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग कायम राहिल्यास घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भाच्या लगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होऊन विदर्भात चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस विदर्भाला पिवळा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा…गडचिरोलीमध्ये घबाड सापडले आहे….

हवामान विभागाचा इशारा असा

किनारपट्टी – नारंगी इशारा – बहुतांश ठिकाणी मुसळधार

पुणे, सातारा – नारंगी इशारा – पश्चिम घाट वगळता अन्यत्र हलका पाऊस
विदर्भ – पिवळा इशारा – हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस