लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी- मार्च २०२५मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली वेळापत्रके ग्राह्य धरू नयेत, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले. तसेच राज्य मंडळाचे बोधचिन्ह, नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखांबाबत हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. मात्र, काही संकेतस्थळांवरून फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्याचे राज्य मंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये या दृष्टीने राज्य मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले.

आणखी वाचा-एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ… कधीपर्यंत घेता येणार प्रवेश?

राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांची सविस्तर वेळापत्रके अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिध्द करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली वेळापत्रके ग्राह्य धरण्यात येऊ नयेत. दहावी, बारावीच्या परीक्षांची सविस्तर विषयनिहाय वेळापत्रके स्वतंत्रपणे मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येतील याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व अन्य घटक यांनी नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले.