पुणे : राज्यभरात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर आहे. मागील २४ तासांत सांताक्रुजमध्ये ७५.१, डहाणूत ५७.७, सोलापुरात ८२ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी (२३ सप्टेंबर) रात्रीपासून पावसाचा जोर आहे. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे पावसाने झोडपून काढले. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत डहाणूत ५७.७, हर्णेत ३२.२, कुलाब्यात १५.८, सांताक्रुजमध्ये ७५.१ आणि रत्नागिरीत २४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने संपूर्ण किनारपट्टीवर पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?

पुणे शहर आणि उपनगरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे काही क्षणांत पाणी पाणी होत आहे. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरात झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली. कोल्हापूरसह जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस होत आहे. जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाले, ओढे, बंधारे, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. गगनबावडा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. मागील २४ तासांत १९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सोलापूर शहरात २४ तासांत ८२ मिमी पाऊस झाला. शहरात दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. अक्कलकोट रस्त्यावर पावसाने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला.

मराठवाड्यात सर्वत्र पावसाळी वातावरण झाले आहे. आकाशात ढगांची दाटी झाली आहे. बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहेत. परभणी, लातूरमध्येही पावसाचा जोर आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर शहरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तासभर पाऊस पडत होता. आकाश ढगांनी काळवंडलेले आहे. विदर्भातील अन्य जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर पावसाचे सावट ? जाणून घ्या सभेच्या ठिकाणीची स्थिती आणि पावसाचा अंदाज…

पुणे, रायगडला आज मुसळधार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी पुणे आणि रायगडला लाल इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या शेजारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगातून किनारपट्टी आणि पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी (२५ सप्टेंबर) रायगड, पुण्याला लाल इशारा, तर नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना नारंगी इशारा आणि उर्वरित महाराष्ट्राला पिवळा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा : खातेदाराचे लॉकर परस्पर उघडून दोन कोटी ६५ लाखांचे दागिने लंपास

बुधवारसाठी इशारा

लाल इशारा – रायगड, पुणे
नारंगी इशारा – नगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पिवळा इशारा – उर्वरित महाराष्ट्र