पुणे : वारकऱ्यांना घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना कात्रज -कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात रविवारी रात्री घडली. अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत प्रयागबाई नारायण बोखारे (वय ७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो रविवारी (३० जून) रात्री मुक्कामी निघाला होता. कात्रज – कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक एक येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली.

हेही वाचा : कुष्ठरोग निर्मूलनापासून महाराष्ट्र दूरच! वर्षभरात राज्यात २० हजार रुग्ण आढळले

तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांचे डोके, हाताला दुखापत झाली, तसेच त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.