पुणे : वक्फ बोर्डाच्या जागांचा बेकायदा आणि गैरवापर बंद व्हावा, या जागा मुस्लिमांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात येण्यासाठी सुधारणा विधेयक मांडण्यात आले आहे. मात्र, सरकार मुस्लिमांच्या जमिनी काढून घेणार असल्याचा अपप्रचार केला जात आहे. हा अपप्रचार तातडीने थांबवावा, कोणीही या विधेयकाची चुकीची मांडणी करून दिशाभूल करू नये, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोमवारी पुण्यात स्पष्ट केले.

मॉडर्न महाविद्यालयातील युवा कनेक्ट कार्यक्रमासाठी आलेल्या रिजिजू यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. वक्फ कायद्यात बदल व्हावा, जागांचा योग्य वापर व्हावा, यासाठी या कायद्यातील सुधारणांना मुस्लीम समाजातील अनेक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. त्यावर नागरिकांनी सव्वा कोटींहून अधिक हरकती सूचना पाठवल्या आहेत. हा एक जागतिक विक्रम आहे. इतक्या हरकती सूचना येतील, असा विचारही कोणी केला नव्हता. यातील सर्व हरकती सूचनांची दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : खेळापासून शिक्षणापर्यंत सर्वत्र राजकारणच… केंद्रीय मंत्र्याचे पुण्यात वक्तव्य…

दिल्लीच्या रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री

आतिशी या दिल्लीच्या रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री असतील. केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून त्यांची कर्तव्य बजावता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतिशी यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिकामी ठेवल्यास त्याला काहीही अर्थ नाही, असेही रिजिजू म्हणाले.

हेही वाचा : दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड- पिस्तूल, काडतुसे, कोयते जप्त

महाराष्ट्रात महायुतीलाच पाठिंबा

केंद्र सरकारची कामगिरी, राज्यातील महायुती सरकारची कामगिरी पाहून महाराष्ट्राची जनता महायुतीलाच पाठिंबा देईल. राज्यात जातीपातीवरून विभाजन करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.