पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने बांधकाम ठेकेदाराची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी ज्ञानेश्वरी अमर बिरादार आणि अमर बिरादार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका बांधकाम ठेकेदाराने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार पौड रस्ता परिसरात राहायला आहेत. ते बांधकाम ठेकेदार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिरादार दाम्पत्याशी बांधकाम ठेकेदाराची २०१९ मध्ये ओैंध भागातील एका कार्यक्रमात ओळख झाली होती. त्यानंतर आरोपींशी त्यांच्या परिचय वाढला.

शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात इन्कोेफिना कन्स्टलिंग कंपनी सुरू केली असल्याची बतावणी बिरादार दाम्पत्याने ठेकेदाराकडे केली. कंपनीत दहा लाख रुपये गुंतविले तर दरमहा अडीच ते चार टक्के परतावा मिळे, तसेच मूळ रक्कम अडीच वर्षात परत मिळेल, असे आमिष बिरादार दाम्पत्याने त्यांना दाखविले. त्यानंतर ठेकेदाराने बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक करण्यास काही रक्कम दिली. त्यांनी ठेकेदाराला परतावा दिला. परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर ठेकेदाराचा भाचा, पती यांनी बिरादार दाम्पत्याकडे गुंतवणूक करण्यास रक्कम दिली. त्या वेळी आरोपींनी दरमहा सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर ठेकेदारांनी वडील आणि आईच्या नावे आणखी रक्कम गुंतविली. त्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे परताव्याची रक्कम दिली नाही.

रक्कम कमी प्रमाणात मिळाल्याने ठेकेदाराला संशय आला. त्यांनी बिरादार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बिरादार दाम्पत्याने कार्यालय अन्यत्र स्थलांतरित केल्याची माहिती मिळाली. चौकशीत बिरादार दाम्पत्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली.

बिरादार दाम्पत्याने इन्फोफिना कन्सल्टंट कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर बिरादार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली.

फसवणुकीचे प्रकार वाढीस

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. समाज माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारे संदेश पाठविण्यात येतात. सायबर चोरटे गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढतात. अशा प्रकारच्या संदेशाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.