पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने फुकट्या प्रवाशांवरील कारवाई तीव्र केली आहे. मे महिन्यात विनातिकीट, अनियमित आणि सामानाची नोंदणी न करता प्रवास करणाऱ्या २४ हजार ५११ जणांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. गेल्या महिन्यात या कारवाईतून रेल्वेने दररोज सरासरी ८ हजार प्रवाशांवर कारवाई केली असून, एकूण अडीच कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पुणे विभागाने मे महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या २४ हजार ५११ प्रवाशांकडून १ कोटी ९६ लाख रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या महिन्यात या मोहिमेत तिकीट तपासणीदरम्यान २४ हजार ५११ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ९६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनियमित प्रवास करणारे ८ हजार ४७४ प्रवासी सापडले. त्यांना ५१.०८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या १६७ प्रवाशांकडून ३२ हजार २९५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा : आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू… राज्यात जागा किती, अर्ज भरण्यासाठी मुदत किती?

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.