पुणे : घोरपडीतील नियोजित रेल्वे उड्डाणपुलाजवळ खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून नऊ वर्षांचा शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली. शुक्रवारी शाळेतून निघालेला मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी याबबात तक्रार दिली. शनिवारी सायंकाळी शाळकरी मुलाचा मृतदेह उड्डाणपुलाजवळील खड्डयात साचलेल्या पाण्यात सापडला. अग्निशमन दल आणि मुंढवा पोलिसांनी खड्डयातील पाणी मोटरपंपाद्वारे बाहेर काढून मुुलाचा मृतदेह बाहेर काढला.
क्रिश सुभाष अंगरकर (वय ९, रा. खान रोड, गुरुद्वाराजवळ, लष्कर) असे मृत्यमुुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिश घोरपडी परिसरातील एका शाळेत चवथीत होता. त्याचा मोठा भाऊ याच परिसरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. क्रिश शाळा सुटल्यानंतर त्याचा भावाकडे जायचा. त्यानंतर दोघे जण एकत्र घरी जायचे. शुक्रवारी (२८ मार्च) शाळा सुटल्यानंतर क्रिश भावाच्या शाळेत गेला नाही. त्यानंतर त्याचा भाऊ एकटाच घरी परतला. क्रिश घरी न परतल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी शाळेतील मित्रांकडे चौकशी केली. त्यांनी त्याचा शोध घेतला. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी क्रिश बेपत्ता झाल्याची तक्रार शनिवारी (२९ मार्च) दुपारी वानवडी पोलीस ठाण्यात दिली. क्रिशचा भाऊ ज्या शाळेत शिक्षण घेत होता. ती शाळा मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्यानंतर वानवडी आणि मुंढवा पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली. घोरपडी परिसरात नियोजित रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रेल्वे फाटक परिसरातील कोंडी दूर करण्यासाठी या भागात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. महापालिकेकडून या उड्डाणपुलाचे काम करण्यात येत असून, हे काम एका कंपनीला सोपविण्यात आले आहे. उड्डाणपुल परिसरात पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मुलगा पडल्याची माहिती या भागातील लहान मुलांनी पोलिसांनी दिली.
त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात क्रिश पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्वरीत दोन मोटारपंपांचा वापर करुन खड्डयात साचलेले पाणी एक ते दीड तासात बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्वरीत क्रिशला रुग्णालयात दाखल केले. नाकातोंडात पाणी शिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
घटनास्थळावरचे दृश्य हेलावणारे
क्रिशचा भाऊ घोरपडी परिसरातील एका शाळेत आहे. दोघे जण एकत्र घरी जायचे. उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदलेल्या खड्याभोवती पाच ते सहा फूट उंचीचे लोखंडी कठडे उभे करण्यात आले आहेत. कठड्याजवळ एक फूट जागा आहे. या जागेतून क्रिश शिरला असावा, उत्सुकतेपोटी डोकावून पाहत असताना तो खड्डयात तोल जाऊन पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. क्रिश खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची आई आणि वडिलांना अश्रृ अनावर झाले. साचलेल्या पाण्यात क्रिशचे दप्तर पडले होते. पाण्यात पुस्तके तरंगत होती. हे दृश्य पाहून त्यांना अश्रृ अनावर झाले.
ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
घोरपडीतील रेल्वे उड्डाणपुलाचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. शाळकरी मुलाचा मृत्यू खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी संबंधित काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला, अशी माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप यांनी दिली.