लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मागणी वाढल्याने टोमॅटो, फ्लॉवर, शेवगा, मटार, गाजर, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (२२ सप्टेंबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक किंचित वाढली.

पितृपंधरवड्यामुळे फळभाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ४ ते ५ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटक, गुजरातमधून ४ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा- विसर्जन मिरवणूकीत ‘आव्वाज’; धनकवडीतील दोन मंडळाविरुद्ध गुन्हे

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार १०० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिरेसह पालेभाज्यांच्या दरात घट

महिनाभरापासून कोथिंबिर, मेथीसह सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत होते. कोथिंबिर, मेथीची आवक वाढल्याने दरात घट झाली. शेपू, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर आहेत. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कोथिंबिरेच्या एका जुडीचे दर ५० ते ७० रुपये होते. मेथीच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपये होते. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते २०००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात- १२०० ते २०००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ५०० ते ८००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ८००, चुका – ६०० ते १०००, चवळई- ५००-८००, पालक- १२००-१५००.

आणखी वाचा-पुणे : पैगंबर जयंती मिरवणुकीत वीज वाहिनीच्या धक्क्याने दोन तरुणांचा मृत्यू

गणेशोत्सवानंतर फळांच्या मागणीत घट

गणेशोत्सवानंतर फळांच्या मागणीत घट झाली. सर्व फळांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी केरळहून अननस ६ ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब ५० ते ६० टन, पपई ८ ते १० टेम्पो, लिंबे एक हजार ते दीड हजार गोणी, कलिंगड ५ ते ६ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, पेरू ७०० ते ८०० प्लास्टिक जाळी (क्रेट), सीताफळ २० ते ३० टन अशी आवक झाली.