पुणे : राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. धरणांमध्ये आठ दिवसांत ६८.२४ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. मंगळवारअखेर (९ जुलै) राज्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा २६.६१ टक्क्यांवर म्हणजे ३८०.६७ टीएमसीवर गेला आहे.
जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवडाभरापासून प्रामुख्याने पश्चिम घाट, मध्य महाराष्ट्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे प्रामुख्याने पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील धरणांत सर्वांत जास्त ६१.४० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. मराठवाड्यामधील धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये फक्त अर्धा टक्क्याने वाढ झाली आहे. मराठवाड्यासाठी संजीवनी ठरलेल्या जायकवाडी धरणामध्ये सध्या ३.११६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असल्याने मराठवाड्याच्या दृष्टीने सध्या तरी चिंताजनक स्थिती आहे.
हेही वाचा >>>IAS पूजा खेडकरांचा भलताच रुबाब; वरीष्ठ अधिकाऱ्यांचं टेबल हटवलं, ऑडीला लाल दिवा लावल्याचा ‘कार’नामा समोर
राज्यातील प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता सुमारे १४३०.६३ टीएमसी आहे. त्यापैकी पुणे विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता ५३७.२८ टीएमसी असून, मंगळवारअखेर २४.०१ टक्के म्हणजे १२९.०२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे .
कोकण विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता १३०.८४ टीएमसी असून, ४६.५० टक्के म्हणजे ६०.८२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
नाशिक विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता २०९.६१ टीएमसी असून, २३.९८ टक्के म्हणजे ५०.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
मराठवाडा विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता २५६.४५ टीएमसी असून, १०.१३ टक्के म्हणजे २५.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
अमरावती विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता १३६.७५ टीएमसी असून, ४०.०७ टक्के म्हणजे ५३.४९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
नागपूर विभागातील धरणांची पाणी साठवण क्षमता १६२.७० टीएमसी असून, ३७.५६ टक्के म्हणजे ६१.०८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
विभागनिहाय पाणीसाठा (टीएमसी, ९ जुलैअखेर)
पुणे – १२९.०२
कोकण – ६०.८२
नाशिक – ५०.२५
मराठवाडा – २५.९७
अमरावती – ५३.४९
नागपूर – ६१.०८
एकूण – ३८०.६७