पुणे : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४२ बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे. पिंपरी पोलिसांनी पारपत्र कार्यालयाकडे पाठपुरावा करून ४२ जणांचे पारपत्र रद्द केले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पारपत्रासाठी मदत करणाऱ्या दलालाचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने निगडीतील साईनाथनगर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात त्यांच्याकडे भारतीय पारपत्र सापडले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तेव्हा पाच बांगलादेशी नागरिकांनी दलालांमार्फत बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा पिंपरी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४२ नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे पुण्यातील पारपत्र कार्यालयातून भारतीय पारपत्र मिळवल्याचे उघडकीस आले, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांनी दिली.
हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेला अतिवृष्टीचा फटका… पण लगेचच उपाययोजना!
बनावट पारपत्र मिळवल्याचे उघडकीस आल्यानंतर पिंपरी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक, तसेच विशेष शाखेने ४२ बांगलादेशी नागरिकांचे पारपत्र रद्द करण्यात यावे, यासाठी पाठपुरावा सुरू केला. पुण्यातील पारपत्र कार्यालयाने ४२ बांगलादेशी नागरिकांचे भारतीय पारपत्र नुकतेच रद्द केले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, डाॅ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लांडगे, सहायक निरीक्षक अंबरिश देशमुख यांनी ही कारवाई केली.
पारपत्रासाठी मदत करणाऱ्या दलालाचा शोध
पिंपरी शहर परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पारपत्र मिळवून देण्यासाठी राॅकी उर्फ देबीत राॅय, जिकू दास उर्फ जाॅय चौधरी यांनी मदत केली. राॅय आणि चौधरी बांगलादेशी आहेत. ते पुणे आणि गोव्यात वास्तव्यास आहेत. पुण्यातील चंदननगर भागातील दलाल साईनाथ येलवाडने बांगलादेशी नागरिकांना पारपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली. बांगलदेशी घुसखोर भारतात आल्यानंतर सुरुवातीला ते बनावट कागदपत्रांद्वरो आधारकार्ड, पॅनकार्ड मिळवतात. या कागदपत्रांचा वापर करून ते भारतीय पारपत्र मिळवतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील बोरिवली पोलीस ठाण्यात मे महिन्यात दलाल साईनाथ येलवाडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोरिवली पोलिसांनी कारवाई करून २० बांगलादेशी नागरिकांना पकडले होते.