आळंदी : आळंदीत पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. काही तासांपूर्वीच माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिलं होतं. इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. हे आश्वासन देऊन काही तास उलटले नाही, की पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीतील गांधीवाडा आजोळघरी पहिला मुक्काम झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. वारकऱ्यांशी संवाद साधला. फुगडी खेळण्याचा आनंद ही घेतला. इंद्रायणी नदीची पाहणी केली. इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून इंद्रायणी स्वच्छ करण्याच वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं.

हेही वाचा…विळखा अमली पदार्थांचा… : पुणे :नशेच्या अमलाखाली शहरातील रात्रजीवन

या आधी ही काही महिन्यांपूर्वी आळंदीत शिंदे यांनी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन वारकऱ्यांच्या समक्ष दिलं होतं. ते आश्वासन हवेत विरल्याच बोलले जात आहे. पुन्हा एकदा दिलेल्या आश्वासनांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्तता करणार का? हे देखील पाहणं महत्वाचं आहे. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळल्याने प्रशासनाची पोलखोलच झाल्याचं बोललं जात आहे.