पुणे जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींपैकी १०६१ ग्रामपंचायतींना आंतरमहाजाल सेवेने (इंटरनेट) एकमेकांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अशी थेट माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे. मात्र, अद्यापही दुर्गम भागातील ३०५ ग्रामपंचायती आंतरमहाजाल सेवेपासून दूर आहेत.

हेही वाचा >>> पुणे : सत्ताबदलानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे; शहरातील ३२, ग्रामीण भागातील ४३ केंद्रे बंद

जिल्ह्यातील १३ पंचायत समित्या, १४०७ ग्रामपंचायती आणि ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच एकात्मिक बालक विकास प्रकल्पांना अत्याधुनिक संगणक प्रणाली उपलब्ध करून आंतरमहाजाल आणि दूरदृश्यप्रणालीच्या (व्हिडिओ कॉन्फरन्स) सुविधेने जोडण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांना दाखले आणि इतर कामासाठी ताटकळत राहावे लागू नये, यासाठी ग्रामपंचायतींना भारत नेट प्रकल्पांतर्गत आंतरमहाजालाशी जोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी १३६६ ग्रामपंचायतींची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ८५० ग्रामपंचयातींपैकी ८४५ ठिकाणी आंतरमहाजाल सेवा पोहोचली असून, पाच ठिकाणी बाकी आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ५१६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील २१६ ठिकाणी आंतरमहाजाल सेवा सुरू असून, उर्वरित ३०० ग्रामपंचायती या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> आता पुणे आणि परिसरात भविष्यात तब्बल २०० किलोमीटरचे मेट्रो मार्ग, विस्तृत आराखडा महामेट्रोकडून सादर

दरम्यान, केंद्राच्या भारतनेट प्रकल्पांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १६ ठिकाणी मोबाइल मनोरे (टॉवर) उभारण्यात आले आहेत. तसेच भोर तालुक्यातील दुर्गम अशा नानावळे गावात मोबाइल टॉवर उभारण्यात आला असून त्याअंतर्गत दहा गावांना फायदा होत आहे. या दहा गावांत आतापर्यंत मोबाइल कनेक्टिव्हिटी नव्हती, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

फोर-जी सेवेसाठी १०७ गावांची निवड
मोबाइलवर फोर-जी सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील १०७ गावे निवडण्यात आली आहेत. या ठिकाणी ७२ मोबाइल टॉवर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या मोबाइल टॉवरद्वारे संबंधित गावांत मोबाइलवर फोर-जी सेवा मिळू शकणार आहे. त्याकरिता शासकीय जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी टॉवर उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader