‘जयपूर-अत्रौली घराणे; काल, आज आणि उद्या’ या विषयावरील परिसंवाद गानसरस्वती महोत्सवाच्या निमित्ताने नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. डॉ. चैतन्य कुंटे यांनी सूत्रसंचालन करताना जयपूर अत्रौली घराण्यापेक्षा, ठरावीक कलाकारांच्या सादरीकरणापेक्षा गायनशैलीबद्दल चर्चा करणे, हा उद्देश असल्याचे नमूद केले. या गायकीची सुरुवातीची अवस्था म्हणजे उस्ताद अल्लादिया खाँ यांच्यापूर्वीचे स्वरूप, त्यांच्या तरुणपणातील गायन आणि त्यानंतर आजारपणात त्यांचा आवाज गेल्यानंतर त्यांनी बदललेल्या गायकीचे स्वरूप अशा तीन टप्प्यांमध्ये कसे बदलले, या प्रश्नाला उत्तर देताना विदुषी श्रुती सडोलीकर यांनी सांगितले की धृपद परंपरेमधला स्वरांचा ठेहेराव, तालाचा पक्केपणा यांचा अभ्यास खाँसाहेबांनी लहानपणी केल्यानंतर ख्यालगायकी वडील आणि काकांकडून शिकताना तानबाजी करण्याऐवजी ठेहेराव असलेली गायकी अंगीकारण्यावर भर दिला होता. रागाची प्रतिमा उभी करण्यासाठी गतीवर आरूढ होऊन तानबाजी करण्यापेक्षा रागाच्या शुद्धतेवर भर देण्याचे शिक्षण त्याना मिळाले होते. आजारपणाच्या काळात खाँसाहेबांनी चिंतन केले ज्यामधून वेगळी गायकी निर्माण झाली. हत्थन खाँसाहेब म्हणायचे, “भैया तुम्हारा गला जहाँ जाता है, वहाँ हमारी नजर नही जाती.” प्रस्तुती करण्यासाठी आपल्या गळ्याला कोणते राग योग्य आहेत, याचे चिंतन त्यांनी केले होते. बंदिशीच्या शब्दांचे वजन ओळखून आलाप, बोल, बोल-आलाप, बोल-ताना आणि ताना यांचा विचार करताना शुद्ध वर्णोच्चाराच्या साहाय्याने आकाराचे वजन सगळीकडे सारखे असावे याचा प्रयत्न केला. किमान अडीच सप्तकामध्ये आवाज फिरावा अशी त्यांची प्रतिज्ञा असायची. त्यांचे शिष्य भुर्जी खाँ आणि त्यांचे शिष्य वामनराव सोडोलीकर यांनी हेच तत्त्व पाळले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा