पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्यांना पाडण्यासाठी सतत प्रयत्न केले, मागीलवेळी पाडले, त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांच्याच प्रचार करण्याची वेळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आली आहे. त्यांच्याबद्दल मनापासून वाईट वाटते. एखाद्याची एवढी वाईट अवस्था होऊ नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला. तसेच महाविकास आघाडीच्या ३५ जागा निवडून येथील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरीत मेळावा झाला. यावेळी पाटील बोलत होते. उमेदवार डॉ.कोल्हे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हासंपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर, पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका अनिता तुतारे, शिरूर जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा…मुरलीधर मोहोळ यांच्या पदयात्रेत गुंडांचा समावेश; महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर

लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनताच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत पाटील म्हणाले, देशावर २१० लाख कोटींचे कर्ज आहे. शेतकऱ्यांच्या अवजारांवर, अन्नधान्यांवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावला आहे. जनतेकडून पैसे लुटण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस महाग झाला. काँग्रेसच्या सत्ता काळात गॅसची किंमत चारशे रूपये होती. आता तोच गॅस एक हजारांच्या पुढे गेला आहे. देशाचे वातावरण बदलले आहे. संपूर्ण देश भाजपच्या विरोधात आहे. दहा वर्षात काय केले, याचा जाब देशातील जनता भाजपच्या उमेदवारांना विचारत आहे. मात्र, त्याचे उत्तर उमेदवारांना देता येत नाही.

काही लोक सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे. मात्र, त्यांची संधी मागच्यावेळीच गेली आहे. आता नवीन चेहरा आहे. परिस्थिती वेगळी आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वळचनीला असलेल्या एका पक्षात जावून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव करण्याची मानसिकता जनतेमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण चांगले आहे, मतदारांच्या घरापर्यंत पोहचावे, त्यांना मतदानासाठी बुथपर्यंत आणावे, चिन्हाबाबत गैरसमज पसरविण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे घराघरापर्यंत तुतारी चिन्ह पोहचविले पाहिजे, असे आवाहन पाटील यांनी केले.

हेही वाचा…भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे २४ कोटींची मालमत्ता

महाविकास आघाडीच्या ३५ जागा निवडून येणार

मराठी माणसाने स्थापन केलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडण्याचे पाप भाजपने केले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात चीड, संतापाची भावना आहे. मतदानातून ही भावना व्यक्त करण्यासाठी जनता सज्ज असल्याचे राज्यभरात दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ३२ ते ३५ जागा निवडून येथील. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार निवडून येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…शिवाजीराव आढळराव यांच्या मालमत्तेत सहा कोटींनी वाढ

संसदरत्न पुरस्काराविषयी कावीळ

संसदरत्न पुरस्काराविषयी काही लोकांना कावीळ झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना दहा वेळा तर अमोल कोल्हे यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. सभागृहात ज्यांनी कधी तोंडच उघडले नाही, त्यांना पुरस्कार मिळण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही पाटील म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil criticized ajit pawar over shivaji adhalrao patil in shirur lok sabha public meeting pune print news ggy 03 psg