पुणे : ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेचा प्रत्यय शनिवारी शिवाजीनगर न्यायालयात आला. न्याय मिळविण्यासाठी एरवी पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. मात्र, अपघातात अपंगत्व आलेल्या शेतमजूर महिलेला न्याय देण्यासाठी न्यायाधीश दोन मजले उतरून खाली आले. तिचे म्हणणे ऐकून घेत तिला न्यायही दिला. तिला १५ लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयाची एक वेगळी बाजू पक्षकारांना पहायला मिळाली.

सुनिता अनिल गायकवाड असे अपंग शेतमजूर महिलेचे नाव आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये वारजे भागातील माई मंगेशकर रुग्णालय परिसरातून रस्ता ओलांडत असताना सुनिता यांना मोटारीने धडक दिली. अपघातात त्यांना अपंगत्व आले. याप्रकरणात नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी ॲड. स्मिता पाडोळे यांच्यामार्फत त्यांनी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दावा दाखल केला. राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर आणि ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनल पुढे हा दावा तडजोडीसाठी ठेवला होता.

राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होण्यासाठी सुनिता या रिक्षामधून शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयातील नवीन इमारतीसमोर झाल्या. मणक्याला दुखापत झाल्याने त्यांना दुसऱ्या मजल्यावर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर आणि पॅनेल न्यायाधीश ॲड. अतुल गुंजाळ दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरले. नवीन इमारतीसमोर रिक्षात असलेल्या गायकवाड यांची विचारपूस केली. ॲड. स्मिता पाडोळे यांच्यामार्फत गायकवाड यांनी त्यांचे म्हणणे पॅनेल पुढे मांडले. सत्र न्यायाधीश क्षीरसागर यांनी आस्थेने चौकशी करुन न्यायालयीन प्रक्रिया मार्गी लावली. ॲड. पाडोळे यांना ॲड. शीतल शिंदे आणि ॲड. स्नेहा भोसले यांनी सहकार्य केले.