मटार स्वस्त; भेंडी, टोमॅटो, काकडी महाग

घाऊक बाजारात रविवारी परराज्यातून फळभाज्यांची मोठी आवक झाली. परराज्यातून बाजारात ६० ट्रकमधून फ ळभाज्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या. नेहमीच्या तुलनेत परराज्यातून दुप्पट आवक झाली. आवक वाढल्याने मटार, पावटा स्वस्त झाला आहे. स्थानिक बटाटय़ाचा हंगाम संपत आला असून दर स्थिर आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भेंडी, टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. उर्वरित फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून मिळून १६० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात येथून मिळून ४ ट्रक कोबी, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून मिळून १४ ते १५ ट्रक हिरवी मिरची, बंगळुरुतून ४ टेम्पो आले, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थानातून  १० ट्रक गाजर, मध्य प्रदेशातून २५  ट्रक मटार, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मिळून लसूण ५ ते ६ हजार गोणी अशी आवक परराज्यातून झाली.

पुणे विभागातून सातारी आले १२०० पोती, टोमॅटो साडेतीन ते चार हजार पेटी, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० पोती, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गाजर १०० पोती, पावटा ४ ते ५ टेम्पो, कांदा १५० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून मिळून बटाटा ५० ट्रक अशी आवक झाल्याची माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.

कांदापात, मुळा, चाकवत महागला

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक गेल्या आठवडय़ाएवढी आहे. मागणी वाढल्याने कांदापात, मुळा, चाकवतचे दर वाढले आहेत. उर्वरित पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. पालकाच्या शेकडा जुडीच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या २ लाख जुडींची आवक झाली. मागणी कमी असल्याने कोथिंबिरीचे दर स्थिर आहेत. घाऊक बाजारात एका जुडीला प्रतवारीनुसार ४ ते ८ रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची विक्री ५ ते १५ रुपये दराने होत आहे. मेथीची आवक चांगली होत आहे. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी)- कोथिंबीर- ४००- ९००, मेथी- ५००-७००, शेपू- ८००- १०००, कांदापात- ६००-१०००, चाकवत- ५००- ६००, करडई- ४००- ५००, पुदिना- २००- ४००, अंबाडी- ६००- ७००, मुळा- ८००-१०००, राजगिरा- ५००- ६०० , चुका- ८००- १०००, चवळई- ५००-७००, पालक- ४००- ५००, हरभरा गड्डी-४००-८००

थंडीमुळे कलिंगड, पपई, लिंबांच्या दरात घट

थंडी सुरू झाल्याने फळांना मागणी कमी आहे. कलिंगड, पपई, लिंबांच्या दरात घट झाली आहे. बोरांना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत फळांची आवक चांगली होत असल्याने दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून अननस १० ट्रक, मोसंबी १०० टन, संत्री १० टन, डाळिंब २०० ते २५० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे ४ हजार गोणी, चिक्कू ३ हजार डाग, पेरू १२०० केट्र्स, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १० ते १२ टेम्पो, सफरचंद ८ ते १० हजार पेटी, बोरे अडीच हजार गोणी, सीताफळ ४ ते ५ टन, द्राक्ष ६ ते ७ टन अशी आवक झाली, अशी माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.मासळीची आवक कमी; दरात वाढ

थंडीची चाहूल लागल्याने बाजारात मासळीची आवक कमी होत चालली आहे. एरवी बाजारात खोल समुद्रातील मासळीची ८ ते १० टन आवक होते. मात्र, रविवारी (२ डिसेंबर) बाजारात खोल समुद्रातील मासळीची १ टन आवक झाली. आवक कमी झाल्याने खोल समुद्रातील मासळीच्या दरात वाढ झाली. इंग्लिश अंडय़ांच्या दरात शेकडा अंडय़ामागे १८ रुपयांनी वाढ झाली आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १ टन, खाडीतील मासळी  ५०० किलो, नदीतील मासळी ५०० किलो तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून ५०० किलो आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. मटण आणि चिकनचे दर स्थिर असल्याचे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे आणि चिकन विक्रेते रूपेश परदेशी यांनी सांगितले.